मुंबई : राज्य सरकारचे सल्लागार कोण आहेत, हे समजत नाही, जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहे आणि या सरकारलाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कांजुरमार्गमधील मेट्रो कारशेडची जागा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सला हलवण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस नागपुरात बोलत होते.
बुलेट ट्रेन स्टेशनची जागा सरकार मेट्रो कारशेडसाठी घेण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. त्याची अधिकृत घोषणा झाली का, माहिती नाही, परंतु हा पोरखेळ चालवला आहे. बीकेसीची जागा ही प्राईज लँड आहे. १८०० कोटी रुपये प्रतिहेक्टर खर्च आला. त्यामुळे २५ हेक्टर जागेसाठी २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. बुलेट ट्रेनच्या स्टेशनची रचना जमिनीच्या तीन लेव्हल खाली करण्यात आली आहे. तर जमिनीवर केवळ पाचशे मीटर जागा व्यापली जाईल. आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राच्या इमारती जमिनीवर असतील. मात्र बुलेट स्टेशन जर आता खाली नेले तर सध्याचा पाचशे कोटींचा खर्च पाच ते सहा हजार कोटींवर जाईल, अशी शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली.
यामुळे राज्य सरकारला अतिरिक्त भुर्दंड तर पडेलच, पण वार्षिक देखभाल-दुरुस्ती खर्च पाच-सहापट अधिक होईल. हे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे, असा घणाघात फडणवीसांनी केला. राज्य सरकारचे सल्लागार कोण आहेत, हे समजत नाही, जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहे आणि या सरकारलाही. महाराष्ट्राचे नुकसान केले जात असून अशाप्रकारे प्रोजेक्ट अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयावर केलेल्या टिकेचाही त्यांनी समाचार घेतला.सरकारने चुकीचे काम करायचे आणि न्यायालयाने चूक दाखवल्यावर न्यायव्यवस्थेला दोष द्यायचा, हे न्यायालयाचा अवमान करणारे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.