श्रीहरीकोटा : भारताच्या 'चांद्रयान-२' ने नियोजित वेळेनुसार पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. याबाबतची माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत ट्विटद्वारे दिली. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री २ वाजून २१ मिनिटांनी यानाने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून थेट चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. ‘चांद्रयान-२’चे ‘ऑर्बिटर’, ‘लॅण्डर’ आणि ‘रोव्हर’ हे तिन्ही भाग सुस्थितीत असून सर्व यंत्रणा उत्तम प्रकारे काम करत आहे.
'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी 'चांद्रयान-२' पुढील प्रवासाबद्दल माहिती दिली. 'चांद्रयान-२' हे चंद्राच्या वाटेवर सहा दिवस असेल आणि सुमारे ४.१ लाख किलोमीटरचा प्रवास करून २० ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल,' असं सिवान म्हणाले. चंद्र हा पृथ्वीपासून ३.८४ लाख किलोमीटर अंतरावर आहे. सात सप्टेंबरला हे यान चंद्राच्या भूमीवर उतरणे अपेक्षित आहे.