नवी दिल्ली : तब्बल २४ वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये इतिहास घडणार आहे. २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांच्या टी-२० क्रिकेटचा समावेश होणार आहे. या स्पर्धेमध्ये ८ संघ सहभागी होणार आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात २०२२ च्या २७ जुलैपासून होणार आहे. या स्पर्धेच्या १८ क्रीडा प्रकारांमध्ये ४५,००० खेळाडू भाग घेणार आहेत.
Women’s T20 Cricket has been confirmed for inclusion at the Birmingham 2022 Commonwealth Games 👏 pic.twitter.com/2rTfeZ0tKn
— ICC (@ICC) August 13, 2019
महिलांच्या क्रिकेटचे सर्व सामने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळले जाणार असून हे सामने आठ दिवस खेळवले जाणार आहेत. १९९८ नंतर पहिल्यांदा क्रिकेटला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्थान मिळाले आहे. १९९८ मध्ये झालेल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाने ५० षटकांच्या क्रिकेट प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा फेडरेशनचे अध्यक्ष लुईस मार्टिन यांनी सांगितले की, "आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे परत एकदा स्वागत होत आहे." क्वालालंपूर येथे झालेल्या १९९८ मधील स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने क्रिकेटमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. यात जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. महिलांच्या टी-२० क्रिकेट प्रकाराला चांगले बनवण्यासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चांगले व्यासपीठ आहे. त्यामुळे आता राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला संघ बाजी मारतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.