'रात्री १ वाजता आदेश जारी करून बोलवलेलं अधिवेशन अवैधच'
30-Nov-2019
Total Views | 719
'आमचे आमदार पोहचू नयेत, म्हणून असे झाले का ?' फडणविसांनी ठेवले नियमावर बोट मुंबई : विधानसभा संस्थगित केल्यानंतर अधिवेशन बोलवण्यापूर्वी संविधानानुसार राज्यपालांचा आदेश काढायचा असतो. रात्री-अपरात्री १ वाजता आमदारांना कळविण्यात आलं, हा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहासमोर मांडला. दिलीप वळसे पाटील यांनी आपल्याला अस्थायी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणारा मा. राज्यपालांचा आदेश वाचून दाखवला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यानंतर 'दादागिरी नही चलेगी' अशा घोषणा देण्यात आल्या. दिलीप वळसे पाटील यांनी राज्यपालांची परवानगी आपण काल संध्याकाळी घेतली असल्याचे सभागृहाला सांगितले.
अस्थायी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सदस्यांना शांत राहण्याची विनंती केली. दिलीप वळसे पाटील यांना आपल्या आसनावरून उठून सभागृहाला संबोधित करावे लागेल. 'विधीमंडळाच्या नियमांना धरून हे अधिवेशन नाही', हे देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाचा परिचय करून दिला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय संविधानात नमूद केल्यानुसार मंत्र्यांनी शपथा घेतलेल्या नाहीत. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी, 'सभागृहाबाहेर घडलेल्या घटनेवर बोलू नका' असा आक्षेप घेतला. 'मी भारतीय संविधानावर बोलायचं नाही का ? मला संविधानावर बोलू द्यायचे नसेल तर मला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही', असे प्रतिप्रश्न उपस्थित केले गेले. शेवटी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे भाषण थांबवले नाही.