मुंबई : नवीन सरकार स्थापणेबाबत भाजप शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वात बोलणी सुरूच असताना राज्यात पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच राजकीय पक्ष शेतकर्यांच्या मदत कार्यात उतरल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापना आणखी काही दिवस पुढे गेल्याचे दिसते आहे.
आजपासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते त्यांना पक्षाने सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्याकरता रवाना झाले. आदित्य ठाकरेही कोंकणात काही जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तर स्वतः उद्धव ठाकरे देखील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौर्यांवर जाणार आहेत. शेतीच्या नुकसानीच्या पहाणीसोबतच त्या त्या भागात काय नक्की मदतीची आवश्यकता आहे हे देखील शिवसेना नेते पाहणार आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह अजितदादा पवार, जयंत पाटील हि नेते मंडळीही पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी दौर्यांवर बाहेर पडली आहेत. भाजपनेही आपल्या नेत्यांना शेतीच्या झालेल्या नुकसानीचा पाहणी अहवाल तयार करून मदतीची नक्की गरज काय आहे ते पाहण्यास सांगितले आहे. आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर सरकारही तातडीने कामला लागले आहे. या सर्व नेत्यांच्या दौर्यांचे कार्यक्रम त्यांच्या त्यांच्या पक्षातर्फे जे जाहीर केले गेले आहेत ते ५ नोव्हेंबरपर्यंतचे आहेत. त्यामुळे किमान ५ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकारचा शपथविधी होणार नाही अशी अटकळ राजकीय निरीक्षक बांधत आहेत.