नेपियारमध्येही भारतच शेर
ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चित करीत अगदी सिंहासारखा क्रिकेटजगतात आपलं अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय संघाने आणखी एका संघाची शिकार केली. भारतीय संघ जणू एका देशात अगदी आरामात आपली शिकार करत सुटला आहे. बुधवारी झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातही भारताने तेच केले. न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला डोकं वर काढायची संधी दिली नाही. दहा वर्षांनंतर न्यूझीलंडला मायभूमीत नमवायची किमया भारताच्या शिलेदारांनी केली आणि पाच सामन्यांच्या या मालिकेत आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली, कदाचित त्यांनी नेपियार मैदान हे फलंदाजांसाठी उत्तम असल्यामुळे हा निर्णय घेतला असावा, मात्र हा निर्णय त्यांचाच अंगाशी आला. सलामीवीर मार्टिन गप्टील आणि कॉलिन मुन्रो अवघ्या १८ धावांतच शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. एकामागोमाग एक पत्त्याच्या घरांसारखे सगळे फलंदाज तंबूत परतले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने दुसऱ्या बाजूने आपल्या संघाची बाजू लावून धरली. मात्र, दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज आपल्या कर्णधाराला साथ देऊ शकला नाही आणि अवघ्या १५७ धावांत न्यूझीलंडच्या संघाचा गाशा गुंडाळला. भारताने हे आव्हान केवळ ३५ षटकांत पूर्ण केले. या सामन्यात सलामीवीर शिखर धवनने ७५ धावा करीत एकदिवसीय क्रिकेटमधला ५००० धावांचा पल्ला ओलांडला आणि वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम फलंदाज ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी केली. या सामन्यात भारतासाठी मुख्य आकर्षण ठरला तो मोहम्मद शमी. नेपियारची खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी खडतर मानली जाते, कारण या खेळपट्टीवर चेंडू विशेष उसळी घेत नाही, मात्र शमीने भेदक मारा करत न्यूझीलंडच्या संघाला उडायची संधीच दिली नाही. २००९ नंतर भारताने कधीच न्यूझीलंडला मायभूमीत नमवले नव्हते, हा इतिहासही विराटसेनेने कोरला. न्यूझीलंड विरुद्धचा पुढचा सामना दि. २६ जानेवारी रोजी बे ओव्हल या मैदानावर होणार आहे. याही सामन्यात भारताचे पारडे जड असले तरी, भारताला मार्टिन गप्टील आणि कर्णधार केन विल्यमसन यांचा धोका असणार आहे. त्यामुळे पुढील सामन्याकडे विशेष लक्ष असले तरी, २०१८ प्रमाणे २०१९ हे सुद्धा भारतीय संघाकरिता ऐतिहासिक वर्ष ठरो, एवढीच इच्छा!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/