पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘करिअर’च्या दृष्टीने दहावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे, या अनुषंगाने त्यांना शास्त्रीय पद्धतीवर आधारित समुपदेशन व सुयोग्य मार्गदर्शन मिळावे, या हेतूने गेल्या वर्षीपासून नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘अंतरंग फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमादरम्यान गेल्यावर्षी नववीत शिकणार्या सुमारे साडेबारा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तीन टप्प्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक गटात सुमारे ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सध्या दहावीत शिकणार्या ९ .४६ टक्के विद्यार्थ्यांना शेतीमध्ये रस असून त्यांना ‘शेतीतज्ज्ञ’ व्हायचे आहे, तर ७ .३० टक्के विद्यार्थ्यांना देश रक्षणासाठी सैन्यात जाण्याची आणि ७ .२५ टक्के विद्यार्थ्यांना पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा असल्याची माहिती पालिका उपायुक्त मिलिंद सावंत यांनी दिली.