प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची भूमिका
उत्तम मानसिक स्वास्थ्य आणि आनंदासाठी जगण्यालायक वातावरण जळगाव शहरात निर्माण व्हायला हवे, त्यासाठी सार्यांची मने व मते एकजीव व्हायला हवीत. त्यादृष्टीने सार्यांनी पक्षभेद, मनभेद, मतभेद विसरुन, संघर्षविरहित समूहशक्तीयुक्त संस्कृती निर्माण केली पाहिजे, असे आवाहन लवकरच मनपात सत्ता सांभाळू इच्छिणार्या सर्वपक्षीय मान्यवरांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार बेंडाळे यांनी केले.
खान्देशातील सर्वात मोठी व नावलौकिक प्राप्त शैक्षणिक संस्था खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि अध्यात्म तसेच धर्म व संस्कृतीचे अभ्यासक प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी तरुण भारतने साधलेल्या संवादात हा आत्मिक उन्नयन आणि एकात्म भावाचा अनोखा विचार मांडला. बेंडाळे यांना प्रज्ञावंतसह अनेक पुरस्कार बहाल झालेले आहेत. ते कृषीविज्ञान, तंत्रज्ञानाचेही अभ्यासक असून एम.एस्सी.त (कृषी) सुवर्णपदक विजेते आहेत.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सुसंवादात ते म्हणाले की, चांगले रस्ते, पुरेसा वीज व पाणीपुरवठा, कचरामुक्त आणि सुंदर, स्वच्छ, हिरवेगार शहर अशी प्रतिमा निर्माण करणे हा वरवरचा दृष्टीक्षेपात येणारा दर्शनी भाग आहे.
सध्या निवडणूक रिंगणातील जो तो कोटी कोटी रु. आणण्याची ग्वाही देत आहे. केवळ पैसा आणून माणूस सुखी, संपन्न होईलच, असे नाही. ब्रिटिश काळापासून संस्कार आणि संस्कृतीला आपण विसरत आहोत, अध्यात्म, चिंतनयुक्त कार्यपद्धती लोप पावत आहे. अशा कार्यपद्धतीची शृंखला निर्माण करता आली तर मग पैसा वा पक्ष व व्यक्ती केंद्रित राजकारण करण्याची आवश्यकता राहणार नाही. आत्मिक विकासाच्या आधारे मानवी जीवन संपन्न करता येईल, असा विचारही नंदकुमार बेंडाळे यांनी मांडला.
ते म्हणाले की, २० वर्षांपूर्वीचे जळगाव शहर आणि आता त्याची अवस्था लक्षात घेता भौतिक आणि अध्यात्मिक पातळीवरही शहर अर्धवट जाणवते. त्या तुलनेत त्यावेळेचे औरंगाबाद, नाशिक शहर सध्या खूप पुढारलेले वाटते. देशात सर्वच विधायक विचारांच्या अंमलबजावणीत लक्षवेधक कामगिरी करणारे इंदूर शहर सांस्कृतिक आणि अध्यात्मिक उन्नयनाची साक्ष देणारे ठरते. याचा बोध जळगावातील धुरिणांनी घ्यायला हवा, असा विचारही नंदकुमार बेंडाळे यांनी मांडला.