मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार प्रविण दरेकर यांना अटक करण्याचा प्लॅन असल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, ११ मार्च रोजी केला. मुंबई शहरातील अभ्युदय नगर येथील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५१ व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक प्रसाद लाड, शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, माजी नगरसेविका आशा मामेडी तसेच अभ्युदय नगर परिसरातील रहिवासी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबई बँकेची चौकशी लावून जेरीस आणण्याचे ठरवले होते. अगदी प्रविण दरेकरांना अटक करण्यापर्यंतही मजल गेली होती. यात आणखी बऱ्याच लोकांची नावे होती. पण आपण या पापाचे धनी होता कामा नये, हे मला कळले आणि मी माझी स्पीड वाढवून टांगा पलटी करून टाकला."
"अडीच वर्षांपूर्वी २०२२ मध्ये या राज्याने मोठा उठाव आणि संघर्ष पाहिला. जगातला ३३ देशांनीही त्याची नोंद घेतली. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात सुखा समाधानाचे दिवस येण्यासाठी आम्ही सरकार बदलले. राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींचे आम्ही भाऊ झालोत. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नसलो तरी या राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आम्ही जन्म घेतला," असे ते म्हणाले.
मुंबई बँकही आता माझी लाडकी बँक झाली!
"५० वर्षांमध्ये ५० शाखा हा टप्पा ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवल्यामुळेच मुंबई बँकेला शक्य झाले. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात ग्रोथ आणणारी ही बँक आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांना २५ हजारांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय या बँकेने घेतला असून त्यामुळे मुंबई बँकही आता माझी लाडकी बँक झाली आहे. गेली अनेक वर्षे अभ्युदय नगरचा पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित असून याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल. मुंबईतील रखडलेले प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ७ शासकीय यंत्रणांना एकत्रित आणून हे प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत राहायला यावा यासाठी आमचे प्रयत्न असून निवडणुकीपुरता मराठी माणूस न आठवता त्यांचे प्रश्न सोडवून कायमस्वरूपी त्यांच्या मनात घर करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.