"...तर आज आदित्य ठाकरे तुरुंगात असते!" नितेश राणेंचा हल्लाबोल
11-Jul-2024
Total Views |
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात चांगल्या प्रकारे कारवाई झाली असती तर आज आदित्य ठाकरे तुरुंगात असते, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह हा आदित्य ठाकरेंचा डुप्लिकेट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊतांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर थेट भूमिका मांडण्याची यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे दुसऱ्यांना युजलेस बोलण्याच्या आधी तुमचा मालक किती मोठा स्पाईनलेस आहे याचा आधी अंदाज घ्या," असा टोला त्यांनी लगावला.
"मिहीर शाह प्रकरणात महायूती सरकारने जेवढी तत्परतेने कारवाई केली तेवढी तत्परता तुमच्या महाविकास आघाडी सरकारने कधीच दाखवली नसती. तेवढ्याच प्रामाणिकपणे दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणावर कारवाई झाली असती तर आज आदित्य ठाकरे तुरुंगात असते. मिहीर शाहाचं दुसरं रुप आदित्य ठाकरे असून त्यांचीही तिच प्रवृत्ती आहे. त्यावेळी दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरण लपवल्याने ते आज बाहेर फिरत आहेत. आदित्य ठाकरे हे मिहीर शाहाचेच डुप्लीकेट आहेत. त्यामुळे जो नियम मिहीर शाहाला लागू होतो तोच नियम आदित्य ठाकरेंनादेखील लागू होतो," असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे.