मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (ABVP Surat Baithak) एक दिवसीय केंद्रीय कार्यसमिती बैठक सूरत येथे बुधवार, दि. ०५ मे राजी संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी पर्यावरण विषयात योगदान देण्यासाठी उपस्थित प्रतिनिधींनी शपथ घेतली आणि विश्व पर्यावरण दिवस साजरा केला. बैठकीची सुरुवात दिप प्रज्ज्वलन व माता सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
डॉ. राजशरण शाही बैठकीच्या उद्घाटन सत्रात म्हणाले की, "भारताची लोकशाही सदैव समृद्ध आणि सशक्त होत असून पूर्ण विश्वात एक सकारात्मक दिशा दाखवत आहे. भारत लोकशाहीची जननी आहे, ह्या लोकशाहीच्या व्यवस्थेत सर्वांचा सहभाग असल्याने देशात एक सकारात्मक वातावरण उत्पन्न झाले आहे. आधुनिक भारताची सशक्तता, बंधुत्व, आणि समानता या महत्त्वाच्या मूल्यांची धारणा अत्यंत प्राचीन काळपासून असून, त्यांना नियमित विकसित करण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीचे मूल्य लोकजीवनात स्थापित करण्यासाठी लोकसंघर्ष केला पाहिजे. देशात 'स्व' आणि 'स्व-ज्ञान' या आधारित व्यवस्था नव्याने स्थापित करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये भारतीय मूल्यांवर आधारित बदल आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे."
राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले की, "वर्तमान काळ भारताचा अमृतकाळ आहे, भारत आपल्या लक्ष पूर्तीसाठी विविध क्षेत्रांमध्ये पुढे जात आहे. विद्यार्थी परिषदेने देशभरातील विविध शैक्षणिक संस्थानांमध्ये रचनात्मक आणि आंदोलनात्मक कृतींमधून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. शिक्षण, पर्यावरण, खेळ आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर अभाविपचे कार्यक्रम आणि अभियान युवांमध्ये बदल घडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत आहे. भारत वैश्विक नेतृत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे."
राष्ट्रीय कार्यकारी परिषद बैठक
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारी परिषद बैठक ०७ ते ०९ जून या कालावधीत होणार आहे. या बैठकीत सर्व राज्यांचे प्रतिनिधी भाग घेणार आहेत. शिक्षण, पर्यावरण, सामाजिक विषयांवर विस्तृत चर्चा बैठकीदरम्यान होईल. यानंतर देशभरातील विद्यार्थी परिषदेच्या कार्यावर विस्तृत चर्चा होईल. गुरुवार, दि.०६ जून रोजी संध्याकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 'नागरिक अभिनंदन सोहळा' होत असून यावेळी मुख्य अतिथि म्हणून ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी आणि सूरतातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती असेल.