ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांचे प्रतिपादन
मुंबई : खिलाफत चळवळीच्या १९२१ ते २४ या कालावधीतील कालखंडाला शंभर वर्ष पूर्ण होत असतानाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार या सरकारने काश्मिरमधील ३७० कलम रद्द करणे तसेच रामजन्मभूमी मंदीराचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम करून ख-या अर्थाने खिलाफत चळवळीच्या विचारधारेला संपवण्याचे काम केले आहे.
त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या वर्षी पाकिस्तानचा विरोध असून ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजमध्ये भारताला आमंत्रित केले गेले, यामुळे खिलाफत चळवळीचे विचार शतकाच्या कालावधीनंतर जगातून पूर्णतः संपले आहेत, असे विचार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांनी व्यक्त केले. खिलाफत चळवळ तसेच दक्षिण-पूर्व आशियात त्याचे झालेले दूरगामी परिणाम या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते.
खिलाफतीने द्विराष्ट्रवाद रुजवला
१८५७ साली हिंदू-मुसलमानांच्या ऐक्याविषयी बोलणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९२२ लिहिलेल्या हिंदुत्व या ग्रंथात अगदी विरोधी भूमिका घेतली. याचे कारण म्हणजे मोपल्यांच्या बंडानंतर झालेली हिंदूंची कत्तल तसेच खलिफाशी निष्ठा ठेवून भारतीय मुसलमानांनी घेतलेली हिंदूविरोधी भूमिका, ब्रिटीश राज्य संपूर्ण खलिफाचे राज्य आणण्याची त्यांची संकल्पना या गोष्टी कारणीभूत आहेत.
तुर्कस्थानच्या सुलतानाच्या खलिफापदाला पहिल्या महायुद्धानंतर धक्का पोहचल्यानंतर भारतातील मुसलमानांनी त्याचे स्थान वाचविण्यासाठी लढा दिला. त्यासाठी हिंदूंनीही सहभाग दिला तर त्याला धार येईल आणि त्यातून दोन्ही धर्मियांचे ऐक्य दिसेल, असे चुकीचे विचार जाणीवपूर्वक बिंबवण्यात आले, त्यानंतरच्या काळात या खिलाफत चळवळीने द्विराष्ट्रवाद रुजवला. त्याला खतपाणी घालण्याचे काम तत्कालीन राजकीय तसेच मुसलमान नेत्यांनी केले. महात्मा गांधीजींची याप्रकरणी बोटचेपी भूमिका होती. उघडउघड त्यांना विरोध करण्याचे धाडस कुणाचेही नव्हते. त्यातूनच मग जिनांचा उगम झाला आणि पाकिस्तानची निर्मिती केली, खिलाफत चळवळीने भारतीय मुसलमानांमधील मरगळ दूर झाली. ती पाकिस्तानची निर्मिती होईपर्यंत, असे विश्लेषणदेखील त्यांनी केले.
खिलाफतने मोपले हत्याकांड घडविले
मलबारचे हत्याकांड खिलाफत चळवळीतूनच घडले. अली बंधूंनी अफगाणिस्तानच्या अमिराला तार पाठवून ब्रिटिशांऐवजी अफगाणच्या खलिफाचे राज्य भारतावर असावे, असे कळवले. त्याचा परिणाम मुसलमानांवर अधिक झाला. मोपल्यांना अली मुसलियार याने उठाव केला. त्यावेळी ब्रिटिशांच्या फौजेत हिंदू होते. त्यांनी हे बंड मोडून काढले. त्यामुळे हिंदूंवर राग काढून मोपल्यानी अन्न्वित अत्याचार केले. गांधींनी याबाबात ब्र काढला नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. नंतर अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिशांचा निषेध करण्यात आला. पण मोपल्यांच्या हत्याकांडाबाबतचा सत्यशोधक समितीचा अहवाल पुढे कधीच आला नाही.
मुगलांना खलिफा मान्य नव्हते
खिलजी, घोरी, तुर्कांनी हिंदुस्थानावर आक्रमण करताना त्यांनी स्वतःला अब्बासी खलिफाचे प्रतिनिधी मानले होते. पण तुघलक शासन काळात परिस्थिती बदलली. तुर्कीचे साम्राज्य आकारमानाने मोठे असले तरी लोकसंख्येने कमी होते. याउलट हिंदुस्थानावरील मुगल साम्राज्य संख्येने अधिक होते. त्यामुळे अकबर ते औरंगजेब काळात तुर्कींच्या खलिफाला मान्य केले जात नव्हते. त्यातूनच १७५७ साली मुघलांचे तख्त फोडल्यानंतर तसेच १८५७ च्या बहादुर शहा जाफरला अटक केल्यानंतर उलेमा, उमराव यांचे मुगलांच्या गादीवरील अवलंबन संपले.
त्यानंतर मात्र इथल्या मुसलमानांना खिलाफतविषयीची आस्था वाढू लागली. त्यांना ब्रिटिशांविरुद्ध कुणाचा तरी राजाश्रय हवा होता. तो त्यांना तुर्की राजात दिसला. १८५७ नंतर इंग्रज साम्राज्यानंतर सामाजिक सुधारणा होऊ लागला. हिंदू समाज वेगाने प्रगती करू लागला. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर हिंदू व ख्रिश्चन यांनी पदवी संपादन केल्या. पण मुसलमान वेगळे राहिले. त्यांना वाटत होते की, ब्रिटीश लवकरच जातील. नंतर आपले राज्य य़ेईल. दारूल उरूल देवबंद, फिरंगी महल अशा मुस्लिम संस्था पुढे आल्या, असे ऐतिहासिक संदर्भदेखील अनय जोगळेकर यांनी दिले.
इस्लाम स्थापननेच्या वेळीच प्रमुखाचे धर्म आणि सत्तेचे प्रमुखपद होते. प्रेषित मोहम्मद यांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांनी त्यांचे सासरे आबु बकर यांची निवड केली. वास्तविक प्रेषितांनी आपले उत्तराधिकारी जाहीर केले नव्हते. पण राजकीय सोय म्हणून ही निवड केली गेली. त्यानंतर खलिफा हा त्यांचा प्रमुख मानला गेला. कुरेश जमातीतून त्यांची पुढे निवड होत गेली. नंतर घराणेशाहीतून ही निवड होत गेली. घराणेशाही, भ्रष्टाचार यामुळे खिलाफत चळवळीच्या विरोधात वातावरण निर्माण झाले. मुसलमानांनी ठिकठिकाणी उठाव केले, अशी माहितीही त्यांनी यासंदर्भात दिली.