आज पुन्हा एकदा कोरोनाच्या कुरुक्षेत्रावर विजय मिळवायचा असेल तर श्रीकृष्णाची गरज भासणार आहे. पुन्हा एकदा सत्याचा विजय आणि दुर्गुणाचा पाडाव करायची खरी गरज आज आहे.
आज आपल्याला एक विश्व म्हणून जगायला लागेल. एकेक देश म्हणून आपण लढायला लागलो, तर कोरोनाचे हे युद्ध आपण कधीच जिंकणार नाही. आज पुन्हा एकदा कोरोनाच्या कुरुक्षेत्रावर विजय मिळवायचा असेल तर श्रीकृष्णाची गरज भासणार आहे. पुन्हा एकदा सत्याचा विजय आणि दुर्गुणाचा पाडाव करायची खरी गरज आज आहे. कोरोना व्हायरस हा विषाणू आता आपल्या सगळ्यांच्या देशातच नाही, तर मनामनांत, शरीरांतही व्यवस्थित घुसला आहे. जवळजवळ ८० टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाचा जादुगार छुपा रुस्तम होऊन बसला आहे, तर तीन टक्के लोकांमध्ये त्याने आपला खुनी इरादा सिद्ध केला आहे. आपल्या देशात कोरोनामुळे होणार्या मृत्यूचा दर तसा तुलनेने कमीच आहे. याचे ठोस असे कारण तरी कुणाला उमगलेले नाही. पण, त्याची सैद्धांतिक कारणे अनेकविध आहेत.
‘लॉकडाऊन’मुळे आपण कोरोनाला भुईसपाट करतो आहोत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे शास्त्रीय विश्लेषण होईलच. पण, या घडीला कोरोनासाठी कुणी देश महान नाही की, श्रीमंत अथवा गरीब नाही. विकसित, विकसनशील वा अविकसित हा भेदभावही कोरोना पाळत नाही. त्यामुळे आपल्यापैकी बर्याच जणांच्या मनात या विषाणूबद्दल आदरही निर्माण झाला असल्यास आश्चर्य वाटायला नकोच. तात्त्विकदृष्ट्या या जगात असा कुठलाही भेदभाव न करणार्या जीवाबद्दल, मग तो विषाणू असो वा आणखी कुणी असो, आपल्या मनात नकळत कुतूहल निर्माण होते, यात वाद नाही. असो. तर या घडीला संहारक्षमतेची अमर्याद ताकद आणि भेदाभेदाची भिंत नसणारा कोरोना हा एकमेव जीवंत असामी या जगात अस्तित्वात आहे आणि आपण त्याचा जीवंतपणी अनुभव घेत आहोत, हे चित्तवेधक सत्य. कुणासाठी ते भयंकर हृदयद्रावक सत्य आहे, तर काहींसाठी ते आव्हानात्मक सत्य आहे. पण, मुळात ते सत्य तथ्यही आहे, हे महत्त्वाचे आहे.
आपण ‘कोविड-१९’ आपल्या जीवनात येण्याआधी अनेक भंपक व बेगडी गोष्टींनी युक्त अशा समाजातच काय, जगातही वावरत होतो. अर्थात, ‘कोविड-१९’च्या जगातसुद्धा या बेगडी अस्तित्वाची कमी नाही. कारण, असं असणं संधीचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधणं हा स्वभाव वा प्रवृत्ती आहे. जसं ‘कोविड-१९’ला औषध नाही, तसं या स्वभावाला पण नेमकं अचूक औषध नाही, हेही तितकेच खरे. आपण त्यानाही जसं झेललं, तसं ‘कोविड-१९’लाही झेलतोच आहोत आणि पुढेही का...कू न करता झेलणारच आहोत. पण, कोरोनाच्या अनपेक्षित संकटाने अनेकांचे ‘झूठा सच’ उघडे पाडले हे खरे. खरं तर आता गरीब राष्ट्रांचीच नव्हे, तर जगाची एकसंघ विकलता आपण लक्षात घेतली पाहिजे. जगातले अद्वितीय महान नेते म्हणा, वर्चस्वातीत असलेल्या शास्त्रीय संस्था म्हणा आणि जबरदस्त आर्थिक बळ असलेल्या राजकीय अस्तित्वांना कोरोनाने हात जोडायला लावलेच आहेत. चला नम्र व्हा, उगाचच फुकाचा शहाणपणा नको, हे कोरोनाने आपल्या ‘नोव्हेल स्टाईल’मध्ये सांगितले आहे. संदेश पूर्ण पारदर्शी आहे. शिकणार्याला आता तसा पर्याय उरलेला नाही. पण, शिकायची प्रेरणा हवी.
आपण श्रीमंत देशातही कोरोनामुळे मृत्यूचे तांडवनर्तन पाहिले. तेथे तर सगळे काही होतेच. मग जिथे या आरोग्यसुविधा नाहीत, ‘जॉब सिक्युरिटी’ नाही, त्या विकल देशाची परिस्थिती किती भयानक असू शकेल, याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. रोजंदारीवर दैनंदिन जीवन जगणार्या मजुरांची आपण स्थिती पाहिली. ज्या पद्धतीने ते आपल्या राज्यात निराश-हताश परतले, तेव्हा आपली सगळ्यांची मती सुन्न झाली. मोठी मोठी सुसज्ज आणि ऐहिक सुखांनी अपरिमित अस्तित्व दाखविणार्या शहरांची उंची अजून इतकी मोठी झाली नाही की, विकल व गलितगात्र माणसाला पोटाची खळगी भरण्याइतकी लागणारी अस्तित्वाची जागा निर्व्याजपणे देऊ शकेल? खरेच कोरोना आपल्याला काहीतरी असामान्य नूतन शिकवित आहे. त्याचे तर नियमित वर्गातच व्याख्यान आणि आख्यान चालू आहे. त्यासाठी खास कोचिंगची गरज कोरोनाला भासत नाही. भल्याभल्यांनी मग ती व्यक्ती असो वा ‘जागतिक आरोग्य संघटने’सारखी जागतिक संस्था असो, सगळ्यांनी अनुभवातून शिकावं, असा हा कोरोनाचा सीझन आहे.
आरोग्याची आपत्कालीन स्थिती ही दैनंदिन जगण्याला आव्हान देणारी परिस्थिती झाली आहे, यात वादच नाही. पण, तरीही ‘आरोग्य’ ही संकल्पना मर्यादित ठेवता येत नाही. त्याचे आपल्या दैनंदिन अस्तित्वावर, जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक पातळीवर अनपेक्षित असे भयानक परिणाम होऊ शकतात, हे मात्र आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. हे ग्लोबल सर्वव्यापी जग आहे. पण, कोरोनाच्या महामारीचा मात्र गुलाम म्हणून. जगत आहे, हा संदेश विस्मयजनक आहेत. पण, आता तरी ‘नम्र होऊन बोध घ्या’ हा महत्त्वाचा संदेश आपण नाकारू शकत नाही. कोरोना एक छोटीशी वाट एका देशातून दुसर्या देशात जायला शोधून काढतो. आपण मोठमोठ्या बॉर्डर ‘सील’ केल्या तरीसुद्धा आज जेव्हा कोरोना एका विभागातून दुसर्या विभागात पसरत चालला आहे. जिथे आरोग्याच्या आणि साध्या जगण्यासाठी आवश्यक अशा सोयी नाहीत, अशा राज्यांत आणि देशांत कोरोनाचा शिरकाव आपल्याला काय सांगतो? आपण कोरोनाचे हे जैविक आणि माणुसकीचे युद्ध जिंकणे शक्यच नाही. आज आपल्याला एक विश्व म्हणून जगायला लागेल. एकेक देश म्हणून आपण लढायला लागलो, तर कोरोनाचे हे युद्ध आपण कधीच जिंकणार नाही. आज पुन्हा एकदा कोरोनाच्या कुरुक्षेत्रावर विजय मिळवायचा असेल तर श्रीकृष्णाची गरज भासणार आहे. पुन्हा एकदा सत्याचा विजय आणि दुर्गुणाचा पाडाव करायची खरी गरज आज आहे. मित्र हो, सज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला!
- डॉ. शुभांगी पारकर