राज्याची किनारपट्टी तीन महिन्यांत अतिक्रमणमुक्त करणार
नितेश राणे यांचा ‘मिरकरवाडा पॅटर्न’ ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश
19-Feb-2025
Total Views | 25
मुंबई : (Nitesh Rane) रत्नागिरीतील मिरकरवाड्याच्या धर्तीवर पुढील तीन महिन्यांत राज्याची किनारपट्टी अतिक्रमणमुक्त केली जाणार आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी तसे निर्देश दिले असून लवकरच ‘अॅक्शन प्लॅन’ (कृती आराखडा) तयार केला जाणार आहे.
पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत राज्याची सागरी हद्द पसरली आहे. मात्र, प्रत्येक टप्प्यावर तिला अतिक्रमणांचा विळखा पडलेला दिसतो. विशेष म्हणजे यातील बहुतांश अतिक्रमणे ही विशिष्ट धार्मिक समुदायांची आहेत. कांदळवनांची कत्तल करून मजारी, दर्गे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्यात येणार आहे. त्यासाठी ‘मिरकरवाडा पॅटर्न’ राबविण्यात येणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार रत्नागिरीच्या मिरकरवाड्यातील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवून हे बंदर खुले करण्यात आले. तेथे आता मत्स्यबंदर प्रकल्प तयार करून स्थानिकांसाठी रोजगारसंधी उपलब्ध करून दिल्या जातील.
दरम्यान, किनारपट्टीच्या हद्दीत जेथे अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील संबंधितांना अतिक्रमण हटवण्यासंदर्भात पहिली नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत दुसरी नोटीस बजावण्यात येईल. तिसर्या नोटिसीपर्यंत वाट पाहिली जाईल. जर स्वतःहून अतिक्रमणे हटवली नाहीत, तर ‘मिरकरवाडा पॅटर्न’ राबवला जाणार आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश सातही सागरी जिल्ह्यांचे (पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
‘ड्रोन’मुळे गैरप्रकारांना चाप
राज्याला लाभलेल्या ७२० किमी सागरी हद्दीतील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ‘ड्रोन’ तैनात करण्याचा निर्णय मंत्री नितेश राणे यांनी घेतला. त्यामुळे ड्रोनद्वारे सातही सागरी जिल्ह्यांत १२ मैलांपर्यंत गस्त ठेवली जात असल्यामुळे किनारपट्ट्यांवरील गैरप्रकारांना चाप लागला आहे. या ‘ड्रोन’मुळेच कांदळवनांच्या आडून केलेली अतिक्रमणे नजरेत आली. अन्यथा कट्टरपंथींचा उन्माद सुरूच राहिला असता.
कार्यवाही तातडीने सुरू करा
राज्यातील किनार्यांवर झालेले अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी. याबाबतचा कृती आराखडा तयार करून, येत्या तीन महिन्यांमध्ये किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीच्या सर्व जागा अतिक्रमणमुक्त होतील, असे पहावे अशा सूचना केल्या आहेत.