मुंबई : भाजपचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी बहुजन आणि दलित समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी दि. ५ ऑगस्टपासून 'बहुजन संवाद यात्रा' सुरू केली आहे. राज्यभरात या यात्रेचे जंगी स्वागत होत असून, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यात्रेच्या निमित्ताने आमदार अमित गोरखे राज्यभर दलित वस्त्या, बौद्ध विहार, तसेच अनेक ठिकाणी भेट देत आहेत. नुकताच त्यांनी पारनेर दौऱ्यादरम्यान मातंग वस्तीत भेट दिली आणि विकास कामांचे भूमिपूजन केले.
दरम्यान, जवळे, गुनोरे, देविभोयरे, अळकुटी, टाकळी ढोकेश्वर गावातील अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्येही त्यांनी भेटी दिल्या. त्याशिवाय जालना येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, पाचोड रोड अंबड साईबाबा मंदिर येथील मातंग, बौद्ध वस्तीत जाऊन नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, कळम, धाराशिवमध्येही अमित गोरखे यांच्या 'बहुजन संवाद यात्रे'ला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात उपस्थित राहून तळेगाव, देहूरोड, सुदुंबरे, येथील दलित वस्तीला भेट देताना श्रीगोंदा दौऱ्यादरम्यान घोडेगाव दौंड येथे अण्णाभाऊ साठेनगर, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी, पारगाव, कोकणगाव, काष्टी येथील बहुजन वस्तीमधील प्रश्न त्यांनी जाणून घेतले. बारामती दौऱ्यादरम्यान खूप मंत्री, आमदार-खासदार बघितले पण आमदार झाल्या झाल्या गावगावात फिरणारा, आमच्यात मिसळणारा, आमचाच वाटणारा कोणी तरी आहे, अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
यात्रेचा उद्देश काय?
ही बहुजन संवाद यात्रा पूर्ण राज्यभर गावगावात, दलित-आदिवासी वस्त्यांमध्ये जाणार असून, त्यांच्या अडचणी, भावना उमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांपुढे मांडल्या जाणार आहेत. यानिमित्ताने दलितांना न्याय देण्याचे काम महायुती सरकार करेल, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.