आजची तरूण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थांचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो. प्रत्येकाने काय करावे, यावर विचार करण्याची वेळ आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात गांजा, कोकेन, हेराईन, चरस, मेफेड्रोन या अमली पदार्थ विक्रीचे हजारो किलो व कोट्यवधी रूपयांचे साठे पकडण्यात आले. पुण्यातील तस्कर ललित पाटील, नाशिक व छत्रपती संभाजी नगरात अमली पदार्थ तयार करणार्या कारखान्यांवरील छापे या ठळक घटना आहेत.
गुजरात एटीएस, एनसीबी, तटरक्षक दल संयुक्त कारवाई
दि. २८ फेबु्रवारी २०२४ला गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलाने संयुक्त कारवाई केली. पुन्हा एकदा मोठा ड्रग्जचा साठा तसेच ३ हजार, ३०० किलो वजनाचे हजारो कोटींचे ड्रग्ज पकडले. गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलाने ही संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी पाच क्रूना अटक केली. जे इराणी आणि पाकिस्तानी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत हजारो कोटी रुपये आहे.
तरूण पिढी नशेच्या दरीत पडत असेल तर...
पुणे येथे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातील तीन दिवसांत पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३ हजार, ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले गेले. जे पुणे विद्येचे, संस्कृतीचे माहेरघर समजले जाते, त्याच पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ येत असतील आणि तरूण पिढी अशा नशेला फसत असेल, तर हा शहराच्या दृष्टीने किती मोठा धोका आहे, हे लक्षात येते. ज्या पुण्यात राष्ट्र, धर्म, संस्कृती रक्षणाच्या चळवळी उभ्या राहिल्या, त्याच पुण्यात अशा अनैतिक, नीतीहीन घटना घडत असताना पुणेकर किंवा अन्य संघटना यावर विशेष काही बोलतही नाहीत, हे दुर्दैवी आणि आश्चर्यकारक आहे.
स्वामी विवेकानंद म्हणायचे की, ”एखाद्या देशाचे ५० वर्षांनंतरचे भवितव्य जाणून घ्यायचे असेल, तर त्या देशाची तरूण पिढी काय करत आहे? हे पाहावे” यानुसार आता विचार केला, तर तरूण पिढी नशेच्या दरीत पडत असेल, तर उद्या देश अंधःकाराच्या खाईत जायला वेळ लागणार नाही. आज भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहत असताना, अशा प्रकारे तरूण पिढी मोठ्या प्रमाणात नशेखोर झाली, तर तरुण पिढीचे भवितव्य नसणारा ‘भोगवादी देश’ म्हणून भारताची ओळख होईल, अशी भीती आहे. शाळेपासून महाविद्यालयांपर्यंत होणारे अमली पदार्थांचे सेवन तसेच विविध अमली पदार्थांची पुण्यात सहज होणारी उपलब्धता ही चिंतेची गोष्ट आहे. अमली पदार्थांच्या या लाटेत तरूण पिढी वाहून जात आहे. तरुण पिढीला शारीरिक, मानसिकदृष्ट्या अधू बनवणार्या अमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात गुन्हे वाढतात. तरूण पिढी वाईट मार्गाला लागते. अमली पदार्थांच्या वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होतो. कोट्यवधी रुपयांचा चोरटा बाजार असलेला, अमली पदार्थांचा व्यवसाय संपूर्ण जगात एक प्रकारे समांतर अर्थव्यवस्थाच चालवतो. अमली पदार्थांच्या तस्करीचा पैसा जगभरात दहशतवादासाठी वापरला जात आहे.
पोलिसांनी प्रकरणी कडक भूमिका घेतल्यास
पोलिसांनीही या प्रकरणी कडक भूमिका घेतल्यास राज्य आणि केंद्र सरकारने आता देश अन् राज्य अमली पदार्थमुक्त करायचे ठरवले आहे; परंतु हेच यापूर्वीच केले असते, तर आताएवढे प्रचंड मोठे दुष्परिणाम होण्याचे टळले असते. गेली कित्येक वर्षे अमली पदार्थांच्या तस्करीला खतपाणी मिळून, आता डोक्यावरून पाणी गेल्यावर, ते जनतेसमोर आले आहे. भ्रष्ट आणि निष्क्रिय यंत्रणा हे याला उत्तरदायी आहेत, त्यासाठी सरकारने अन्वेषण यंत्रणांना मोकळीक द्यायला हवी. अन्वेषणात राजकीय हस्तक्षेप होऊ न देता, पोलिसांनीही या प्रकरणी कडक भूमिका घेतल्यास, तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थांचा भस्मासुर आटोक्यात येऊ शकतो.
देशोधडीला लावणारे हे अमली पदार्थ नेमके काय आहेत, त्याचे धोके कोणते याची माहिती प्रत्येक तरुणाला असलीच पाहिजे. पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकातर्फे वर्षभर जनजागृती सुरू असते. शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जागृती केली जाते. पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून ती ड्रग्जच्या आहारी जाणार नाहीत.
अमली पदार्थांच्या तस्करीला वेगवेगळे कंगोरे आहेत. आता जेवढी माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे, ती फक्त हिमनगाचा पाण्याच्या वरचा भाग आहे. याच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या विभागाने एकत्रित तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. देशातील तरूण पिढी व्यसनाधीन करणे, हा दीर्घकालीन राष्ट्रविघातक नियोजनाचा एक भाग आहे.
दहशतवाद, सायबर गुन्हे आणि नार्कोटिक्स या बाबी वेगवेगळ्या नाही. नार्कोटिक्स, सायबर गुन्हे यातून मिळणारे पैसे देशाच्या विरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याचा धोका आहे. त्यामुळे एकत्रित तपास यंत्रणा उभारण्याची ही वेळ आहे. यासाठी तपास यंत्रणांमधील अधिकार्यांनी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजे. या प्रत्येक घटकांनी केवळ पाठीला पाठ लावून नाही, तर खांद्याला खांदे लावून समन्वयाने एक विचाराने तपास करणे आवश्यक आहे.
पाकिस्तानकडून भारतामध्ये शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी ड्रोन्सचाही अधिकाधिक वापर करत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. पाकच्या ड्रोन्सना नष्ट करण्यासाठी, भारताने स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा पुढील सहा महिन्यांत कार्यान्वित करण्याच्या सिद्धतेत भारत आहे. थोडक्यात, अमली दहशतवाद थांबवायचा असेल, तर बहुआयामी अभियानाची गरज आहे.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन