रसिका शिंदे-पॉल
मुंबई : मराठी भाषेचा अभिमान आणि गर्व महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला आहेच. परंतु, आपली मराठी भाषा अधिक श्रीमंत आणि समृद्ध होण्यासाठी विविध माध्यमांच्या वापरातूनच मराठी भाषेची गोडी आणि शिकण्याची, जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच निर्माण होईल. यात २१ व्या शतकात समाज माध्यमं फार महत्वाची भूमिका बजावतात. मराठी भाषेचा इतिहास कलात्मक पद्धतीने मांडत तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अभिनेत्री, दिग्दर्शिक मधुरा वेलणकर ‘मधुरव : बोरु ते ब्लॉग’ या नाट्यविष्कारातून करत आहे. याचबद्दल ‘महाएमटीबी’शी बोलताना मधुरा म्हणाली की, “आपल्या हातात आधुनिक तंत्रज्ञान आले असून मराठी भाषेच्या प्रसारासाठी याच माध्यमांचा अधिक सदुपयोग केला पाहिजे”.
समाज माध्यमांचा सदुपयोग मराठी भाषेच्या प्रसारासाठी अधिक करावा
२१व्या शतकात तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण गर्भ श्रीमंत झालो आहोत. समाज माध्यमांवर पाहिल्या जाणाऱ्या आशयांत मराठी भाषा प्रयोगात बदल जाणवतो. याबद्दल व्यक्त होताना मधुरा म्हणाली, “समाज माध्यमांमुळे मराठी भाषा बदलली हे जरी नक्की असलं तरी याच समाज माध्यमांवर चांगल्या भाषेत, चांगल्या कलाकृती सादर करणाऱ्या लोकांची संख्या देखील आहेच. भाषा ही प्रवाही आहे, त्यामुळे काळ पुढे गेला की ती बदलतेच, पण तिचे मुळ स्वरुप टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे आपण ध्यानी ठेवले पाहिजे. समाज माध्यमं ही आपल्या सोयीसाठी आहेत, त्यामुळे त्यांचा कसा वापर करावा आणि आपली मुळं कशी सांभाळावी हे समजण्याइतके सगळेच जण ज्ञानी आहेतच. तंत्रज्ञानाला नाव ठेवण्यापेक्षा मराठी भाषेच्या प्रसारासाठी त्याचा सदुपयोग कसा करता येईल यावर प्रत्येकाने भर देणं गरजेचं आहे”.
दरम्यान, मधुरा वेलणकर ही एका वृत्तपत्रात मधुरव सदराअंतर्गत लिखाण करत होती. लॉकडाऊनमध्ये मराठी भाषेबद्दल अधिक जागरुकता आणि प्रसारासाठी काय करावे असा विचार करत असताना तिने ‘मधुरव ऑनलाईन’ हा कार्यक्रम सुरु केला. ज्यात नामवंत नसले तरी लिखाणाची आवड असणाऱ्या काही लेखकांचे साहित्य तिने सादर केले. आणि कालांतराने मराठी भाषा कशी जन्माला आली, प्रवाही होत समृद्ध झाली याचा इतिहास तिने ‘मधुरव : बोरु ते ब्लॉग’ या नृत्य, संगीत आणि नाटक हा तिहेरी मनोरंजनाच्या मिलाफातून एका नाटकाची भट्टी जमवून सादर करण्यास सुरुवात केली.