मुंबई : 'अर्जुन रेड्डी' आणि 'अॅनिमल' या चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा सध्या प्रभाससोबतच्या 'स्पिरिट' या आगामी चित्रपटावर काम करत आहेत. या दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर एक तीव्र आणि अप्रत्यक्ष पोस्ट शेअर करत, एका अभिनेत्रीच्या 'डर्टी पीआर' (खराब प्रसिद्धी मोहिमेवर) जोरदार टीका केली. या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचेही थेट नाव घेतले नसले तरी, काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणने या चित्रपटातून बाहेर पडल्याच्या चर्चांनंतर ही प्रतिक्रिया आल्याने लक्ष वेधले आहे.
चित्रपटात दीपिकाची निवड झाल्यानंतर, अचानक तिच्या एक्झिटची चर्चा सुरु झाली. त्यानंतर त्रिप्ती डिमरी ही अभिनेत्री मुख्य भूमिकेसाठी निवडल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. सोशल मीडियावर 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत संदीप वांगांनी लिहिले, "जेव्हा मी एखाद्या कलाकाराला कथा सांगतो, तेव्हा मी त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो. आपसूकच आपल्यामध्ये एक न बोललेला 'एनडीए' (गोपनीयता करार) तयार होतो. पण तुम्ही माझी गोष्ट उघड करत, तुमचं खरं रूप दाखवलं आहे. एखाद्या तरुण कलाकाराला कमी लेखणं आणि माझी गोष्ट बाहेर सांगणं – हेच का तुमचं फेमिनिझम?"
ते पुढे म्हणाले –
"दिग्दर्शक म्हणून मी माझ्या कलाकृतीसाठी अनेक वर्षं मेहनत घेतो. चित्रपटनिर्मिती हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. पण तुम्हाला हे समजलं नाही. आणि कधीच समजणार नाही."
या पोस्टच्या शेवटी त्यांनी एक हिंदी म्हण वापरत लिहिले –
"असं करा... पुढच्या वेळी पूर्ण गोष्टच सांगून टाका, कारण मला काहीही फरक पडत नाही. #dirtyPRgames. मला ही म्हण खूप आवडते – 'खुंदक में बिल्ली खंभा नोचती है'
दीपिकाला ‘स्पिरिट’मध्ये प्रभासच्या समोर मुख्य भूमिका देण्यात आली होती, आणि तिचं मानधन सर्वाधिक असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, अचानक तिच्या चित्रपटातून बाहेर पडल्यावर, काही माध्यमांनी असा दावा केला की तिचे दिग्दर्शकाशी काही दृश्यांवर, शूटिंगच्या वेळांवर, मानधन व नफ्याच्या वाटपावरून मतभेद झाले होते. तथापि, दीपिका पदुकोण किंवा निर्मात्यांनी या प्रकरणावर कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही.
'स्पिरिट' हा प्रभास अभिनीत एक भव्य पोलीसपट असून, या चित्रपटाचं बजेट सुमारे ३०० कोटी रुपये आहे. एप्रिल २०२४ मध्ये संदीप वांगांनी सांगितले होते की, हा चित्रपट पहिल्याच दिवशी सुमारे १५० कोटींची कमाई करू शकतो. या चित्रपटात दक्षिण कोरियन अभिनेता डॉन ली याचाही समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र, अजूनपर्यंत चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट, तांत्रिक चमू आणि शूटिंग वेळापत्रक याविषयी अधिकृत घोषणा झालेली नाही.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.