मुंबई : भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. त्यांच्या या आरोपाला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो हा आरोप हास्यास्पद आहे. विरोधकांना उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचेही दरेकरांनी सुनावले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेत आमदार दरेकर म्हणाले की, विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो, हा आरोप हास्यास्पद आहे. कालपासून निवडणूक आपल्या हातातून गेली हे महाविकास आघाडीच्या वागण्यातून दिसून येत आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीत आपला पराभव त्यांना स्पष्ट दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत खोटा नरेटीव्ह सेट करून त्यांनी विजय मिळवला. आता या निवडणुकीत त्यांनी सभा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले. आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नरेटीव्ह चुकीचे आहेत हे सांगण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.
दरेकर पुढे म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारने काय केले हे आम्ही जनतेला सांगितले. भविष्यात आमचं सरकार आल्यावर आम्ही काय करणार? महाराष्ट्राची प्रगती कशी होणार? हे देखील आम्ही सांगितले. परंतु महाराष्ट्रात आम्ही ज्या योजना दिल्या आहेत. त्यात लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी कर्जमाफी, वीजबिल कर्जमाफी अशा अनेक योजना महाराष्ट्रातील मतदारांना प्रभावित करणाऱ्या, विश्वास देणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे या योजनांना विरोधकांनी विरोध केला. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात सुरु केलेले प्रकल्प स्थगित करण्याचे काम उद्धव ठाकरेंच्या स्थगिती सरकारने केले. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रगती आणि गती घेतली आहे.
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात महायुतीचे सरकार आपल्याला हवे, असे आहे. तशा प्रकारचे चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे काल अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक केली. दगड मारून कुणाला रक्तबंबाळ करणे ही आमची संस्कृती नाही. दगड कुणी मारले हे चौकशीतून बाहेर येईल. वसई नालासोपाऱ्याला झालेला प्रकार हा तसाच आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे उरलेल्या एक-दोन दिवसात आपल्याला काही करता येते का? महाराष्ट्रातले वातावरण संभ्रमित करून निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या बाजूने वळवता येते का? असा केविलवाणा प्रयत्न सूरु असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.