" माझे त्यांच्याशी... ", राज ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाले एकनाथ शिंदे?
18-Nov-2024
Total Views | 26
मुंबई : (Eknath Shinde) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त २ दिवस उरले आहेत. राज्यात २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पुढील काही तासात प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या सगळ्या रणसंग्रामात काही गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. राज ठाकरेंसोबतचे संबंध चांगले असताना बिनसलं कुठे, या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मौन सोडले आहे.
माझा त्यांच्याशी काही वादविवाद नाही
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेंसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. ते शिंदेंविरोधात इतकया टोकाची भूमिका का घेत आहेत ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "राज ठाकरे यांनी काय बोलायचे , हा त्यांचा विषय आहे. त्यांनी काय बोलायचे, काय ठेवायचे, हे ते ठरवतील. त्यांच्याशी माझी नेहमीच समन्वयकाची भूमिका राहिली आहे. ते माझ्याकडे काम घेऊन यायचे, मी त्यांना मदत करायचो पण आता निवडणूक असल्यामुळे माणूस भाषणात बोलतो. त्यावर मी फार विचार करत नाही. माझा त्यांच्याशी काही वादविवाद नाही. शेवटी त्यांनाही कार्यकर्ते सांभाळायचे आहेत आणि आम्हालाही आमचे कार्यकर्ते सांभाळायचे आहेत."
कम्युनिकेशन गॅप पडल्याचा खुलासा
माहीमच्या जागेवरुन आपले आणि राज ठाकरे यांचे संबंध बिघडले आहेत का, असा प्रश्न विचारला असता, एकनाथ शिंदे म्हणाले की, "थोडा कम्युनिकेशन गॅप नक्की झाला आहे. शेवटी तेही पक्षाचे प्रमुख आहेत. मीही एका पक्षाचा प्रमुख आहे, आणि मुख्यमंत्रीही आहे. काही गोष्टींची चर्चा वेळेवर होणं आवश्यक असते."
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील स्नेहाचे संबंध ताणले गेले आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी शिंदेंकडून शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने राज ठाकरे नाराज झाल्याचे बोलले जात आहे.