मुंबई, दि. ५ : (Rahul Gandhi) काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंचावर काँग्रेस नेत्यांसह खासदार शाहू छत्रपती महाराज हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे, काँग्रेसचा इतिहास तपासला तर या पक्षाने कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला नाही. त्यांचा अनेकदा अपमान केल्याचे दाखले सापडतील. त्यामुळे राहुल गांधींविरोधात रोष व्यक्त होताना दिसत आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा राहुल गांधींना नैतिक अधिकार नाही, अशी भावना शिवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार असताना छिंदवाडा येथे रात्रीच्या अंधारात नगरपरिषदेकडून जेसीबी लाऊन छत्रपती शिवरायांची प्रतिमा हटवण्यात आली होती. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनीही त्यांच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून छत्रपतींचा अवमान झाल्याचे अनेक दाखले मिळतील. इतकंच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देखील काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी आजवर अपमानच करत आलेत. यासर्वांबाबत त्यांनी कधी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली नाही. मग अशा व्यक्तीच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होणे हे कितपत योग्य आहे, हा सवाल विचारला जात आहे.
आधी शिवप्रेमींची माफी मागा!
राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली खरी, परंतु त्यांना जर महाराजांवर बोलायचंच असेल तर पहिल्यांदा पंडीत नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिल्याबद्दल तमाम शिवप्रेमींची आधी माफी मागायला हवी. त्यानंतरच राहुल गांधींना महाराजांवर बोलण्याचा अधिकार आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
महाराज त्यांना सुबुद्धी देवो
राहुल गांधी हे असं व्यक्तिमत्वं आहे ज्याचं भारताच्या संस्कृती आणि धर्मावरती अजिबात विश्वास नाही. ते जे दाखवतायत ते केवळ नाटक आहे. जो व्यक्ती स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करतो, ज्या व्यक्तीच्या पक्षाकडून वारंवार शिवरायांचा अवमान झालाय अशा व्यक्तीच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणे हे अयोग्यच आहे. अनावरण झालंच आहे, तर महाराज त्यांना सुबुद्धी देवो हीच प्रार्थना.
- गोविंद शेंडे, महाराष्ट्र व गोवा राज्य क्षेत्र मंत्री, विश्व हिंदू परिषद
अन्यथा ‘ही’ नौटंकी त्यांनी बंद करावी...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहणं ही शिवप्रेमींसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. परंतु केवळ पुतळा उभा करणं म्हणजे त्यांच्यावरील श्रद्धाभक्ती दर्शवणं असे नाही. त्यांच्या विचाराने आपण चालत असू तरच ती खरी महाराजांची पूजा आहे. काँग्रेस विचारसरणीने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा कधीही चालवला नाही. लॅण्ड जिहाद, गड जिहाद, लव्ह जिहाद यांसारख्या संविधानाला मारक असणार्या जिहादी कारवायांना मैदानात उतरून विरोध करणार असाल तर तुम्हाला खरे शिवभक्त समजू; अन्यथा ही नौटंकी त्यांनी बंद करावी.
- अभयराजे जगताप, कोकण प्रांत संयोजक, शिवशंभू विचार मंच
शिवरायांच्या विचारांचा अपमान!
ज्याठिकाणी राहुल गांधींच्या विचारांचं सरकार आहे, तिथे औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण चालताना दिसतं. मुघल विचारांचं प्रतिक म्हणून राहुल गांधींकडे पाहिलं जातं. अशा व्यक्तीच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणे, यापेक्षा मोठा अपमान शिवरायांच्या विचारांचा असू शकत नाही.
- नितेश राणे, आमदार भाजप
उभ्या जन्मात महाराजांचं नाव घेतलं नाही...
उभ्या जन्मात ज्यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही, ज्यांनी कायम हिंदूद्वेष दर्शवला, ज्यांना महाराजांच्या इतिहासाशी काही देणं घेणं नाही, अशा राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणे निंदनीय आहे.
- नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन