प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास २ वर्षांचा तुरुंगवास
मंत्रिमंडळाचा निर्णय; एक लाखांच्या दंडाची तरतूद
04-Oct-2024
Total Views | 66
मुंबई : (The Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960) राज्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरूंगवासाची, तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अशा वास्तूंना हानी पोहोचवून त्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात येत आहे.
सध्या, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष नियम १९६० (१९६१चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१२) मधील तरतुदींनुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. १९६० सालापासून या दंडात वाढ झालेली नाही. या कायद्यात कठोर तरतुदींचा आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या १९५८च्या अधिनियमातील सुधारणांशी सुसंगत अशा तरतूदी करणे आवश्यक असल्याने हा वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
अतिक्रमणांवर कारवाईचे संकेत
राज्यातील काही गड-दुर्गांवर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे हटवण्यासाठी दुर्ग आणि शिवप्रेमी यांकडून सातत्याने शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. राज्यात याविषयी अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. यानंतर विशालगड, सिंहगड यांवरील अतिक्रमणांच्या विरोधात शासनाकडून कारवाई करण्यात आली आहे; मात्र अद्यापही अनेक गड-दुर्ग यांवर अतिक्रमणे आहेत. सुधारित प्रावधानानुसार गड-दुर्ग किंवा अन्य प्राचीन वास्तूंमध्ये अतिक्रमण करणार्यांच्या विरोधात भविष्यात शिक्षेची कठोर कारवाई करणे यामुळे शक्य होणार आहे.