पाटणा : बिहारमध्ये रोज हत्याकांड होत आहेत. त्यामुळे बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बिहारमध्ये दोन दिवसांपूर्वी एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, त्यातच आता शनिवारी (१९ ऑगस्ट २०२३) दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे.
एकीकडे बेगुसराय येथे मॉर्निंग वॉक करत असताना एका निवृत्त शिक्षकाची रस्त्याच्या मधोमध हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. दुसरीकडे, पूर्व चंपारणमध्ये आणखी एक घटना घडली जिथे दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी एका कंत्राटदाराची गोळ्या झाडून हत्या केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवृत्त शिक्षकाची हत्या बेगुसरायच्या बाचवारा पोलीस स्टेशन परिसरातील फातेहा रेल्वे स्टेशनजवळ झाली. तर कंत्राटदाराची हत्या पूर्व चंपारणमधील चकिया पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर गोळी झाडून करण्यात आली. दुहेरी हत्याकांडाच्या या घटना पाहता बिहार पुन्हा एकदा जंगलराजकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
दोन दिवसांपूर्वी अररियामध्येही दैनिक जागरणचे पत्रकार विमल यादव यांची बदमाशांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यामुळे नितीश कुमार सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. त्याच वेळी, पूर्व चंपारण आणि बेगुसरायच्या घटनांनी 'सुशासन बाबू'च्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.