मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट जरी येताना दिसत असले तरी प्रेक्षकांना फारसे ते पसंत पडत नसल्याचे दिसून येत आहे. परंतु, प्रेक्षकांपर्यंत काही घटना किंवा काही व्यक्तींबद्दल सत्य गोष्टी मांडणेही तितकेच गरजेचे असल्याचा काही दिग्दर्शक आणि कलाकारांचा अट्टहास दिसून येतो. सध्या बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटामुळे तो अधिक चर्चेत असून काही दिवसांपूर्वी रणदीपचा सावरकरांच्या वेशभूषेतील लूक व्हायरल झाला होता. त्याला नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
रणदीप जेव्हा सावरकरांची भूमिका साकारणार असे समोर आले होते, तेव्हापासून त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
रणदीपने सावरकरांची भूमिका साकारताना प्रचंड मेहनत केल्याचे त्याच्या लूकवरुन दिसते आहे. एका मुलाखतीत रणदीपनं आपण या भूमिकेसाठी कशी मेहनत घेतली, कशाप्रकारे डाएट फॉलो केले याविषयी सांगितले आहे. रणदीपने म्हटले की, त्याने सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल २६ किलो वजन कमी केले आहे.
चार महिन्यांपासून रणदीप केवळ खजूर आणि दूध इतकाच आहार घेतो आहे. दुसरीकडे त्याच्या या डाएट प्लॅनवरुन त्याला आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत. काहींनी त्याचं कौतूक केलं आहे. तर काहींच्या नकारात्मक प्रतिक्रियांचा देखील सामना करावा लागला आहे.
रणदीपनं पुढे म्हटले की, समाज माध्यमावर माझ्याविषयी जी चर्चा आहे त्यावर चाहत्यांनी फार विश्वास ठेवू नये. मला असे वाटते मी जे काही करतो त्याची त्यांनी कॉपी करु नये. मला एक गोष्ट सांगायचे आहे की, मी फक्त दूध आणि खजूर इतकाच आहार घेत नव्हतो. मलाही त्याबाबत सल्ला देण्यात आला होता. मी फक्त तेच घेत होतो अशी माहिती जी व्हायरल होत आहे त्याचा फार विचार करु नका.
सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी मी २६ किलो वजन कमी केले आहे. कलाकारांना एखादी भूमिका करताना संबंधित व्यक्तिरेखेच्या देहबोलीचा देखील काटेकोरपण विचार करावा लागतो. त्यावेळी माझे वजन हे ६७ किलो होते. त्यासाठी मला माझ्या डाएटचा खूप उपयोग झाला. असेही रणदीपनं यावेळी सांगितले. दरम्यान, हा चित्रपट यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे.