महानगरांमधील पूरव्यवस्थापनासाठी २५०० कोटींची योजना : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
मुंबई आणि पुण्यासह सात महानगरांचा योजनेत समावेश
13-Jun-2023
Total Views | 52
नवी दिल्ली : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी महानगरांमधील पूरव्यवस्थापन, राज्यांमध्ये अग्निशमन सेवेचे आधुनिकीकरण आणि भूस्खलन उपाययोजनांसाठी ५ हजार कोटी अशा एकूण ८ हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिजन २०४७’ अंतर्गत भारताला आपत्ती प्रतिरोधक बनवण्यासाठी देशातील आपत्ती जोखीम कमी करण्याची प्रणाली अधिक मजबूत करणे आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करणे हा या बैठकीचे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश होता.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी ८ हजार कोटी रुपयांच्या तीन प्रमुख योजनांची घोषणा केली आहे. त्यानुसार, राज्यांमध्ये अग्निशमन सेवेचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी ५ हजार कोटी रूपयांची योजना जाहिर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या सर्वाधिक लोकसंख्येच्या सात महानगरांमध्ये पूरव्यवस्थापनासाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची योजना तर १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भूस्खलन उपाययोजनांसाठी ‘राष्ट्रीय भूस्खलन धोका शमन योजने’साठी ८२५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
ज्या राज्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्प बांधले जात आहेत अशा ७ स्थानांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भेटी दिल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते पुढे म्हणाले, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोकांना वाचवण्यासाठी राज्यांना कठोर प्रोटोकॉल पाठवण्यात आले आहेत. अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होण्याआधीच राज्यांनी त्यावर प्राधान्याने कार्यवाही करावी, असेही आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले आहे.