राष्ट्रासाठी आपल्या प्राणांच्या अंतिम श्वासापर्यंत झटत राहणार्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यामध्ये क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक ओजस्वी आणि बाणेदार चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व म्हणजे क्रांतिवीर बाबाराव सावरकर. त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाविषयी...
नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी दि. १३ जून, १९७९ साली बाबाराव उपाख्य गणेश दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. बाबारावांना बालपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांना वेगवेगळ्या रोगांचा सामना करावा लागला. त्यांना असंख्य वेळा विंचूने दंश केला, टायफॉईड झाला, तरी सर्व आजारांना ते पुरून उरले. यातच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी बाबारावांवर येऊन पडली. पण, बाबारावांनी कुटुंबाची सर्व जबाबदारी व्यवस्थित हाताळली. ते प्रत्येकाची काळजी घेत असत.
त्यावेळी देशभक्तांनी एकत्र येऊन एक संस्था स्थापन केली व देशक्रांतीची सुरुवात झाली. त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामाचे ‘अभिनव भारता‘चे विश्व. दि. १ जानेवारी, १९०० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, रावजी कृष्ण पागे या सर्वांनी मिळून या कार्याला पाठिंबा दिला आणि ‘अभिनव भारत’ संघटनेची स्थापना झाली. सर्व तरुण मंडळी राष्ट्रभक्तीने प्रेरित झाली होती. त्यानंतर तात्याराव सावरकर लंडनला गेले व ‘अभिनव भारता‘चे संपूर्ण कार्य बाबारावांनी पुढे नेले. संघटनेची अखिल भारतीय धुरा बाबारावांनी सांभाळली. ‘अभिनव भारत‘ संघटना बाबारावांनी घराघरात पोहोचवली. स्वातंत्र्यसंग्रामामध्ये आपले मोलाचे कार्य चोख बजावले. त्यानंतर दि. २८ फेब्रुवारी, १९०९ मध्ये त्यांनी सशस्त्र क्रांती केली, म्हणून त्यांना अटक करण्यात आली. कारण होते की, कवी गोविंदांच्या कविता बाबारावांनी प्रकाशित केल्या. यासाठी त्यांना जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली. १९१० मध्ये त्यांना अंदमानला पाठवण्यात आले.
अंदमानमध्ये बाबारावांचा अमानुष छळ करण्यात आला. बाबारावांना सुरुवातीला पहिल्यांदा काथ्या कुटायचे काम देण्यात आले. ते करत असताना त्यांच्या हातातून रक्त येई. पोटात कळा यायाच्या. काथ्या कुटताना पाठीचा कणा मोडून जायचा. त्यानंतर बाबारावांना कोलू ओढण्याचे काम दिले. बाबारावांचे शरीर रोग जर्द झाले होते. खोकताना बाबांना धाप लागायची. जेवणदेखील जात नव्हते. दिलेले काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर त्यांना मारण्याचा आदेश दिला जायचा. असा जीवघेणा प्रकारांचा छळ होई. शरीर थकायचे आणि ते कोलूला लटकून पडायचे. ते बेशुद्ध पडत.
याचदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांना अनंत कान्हेरे यांनी ठार केले. या प्रकरणात वापरण्यात आलेले ब्राऊनिंग पिस्तूल सावरकरांनी पाठवले, असा सरकारला सुगावा लागला. यासाठी त्यांनी सावरकरांना तत्काळ अटक केली. त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तब्बल पाच वर्षांनी अंदमानच्या तुरुंगामध्ये सावरकर बंधूंची भेट झाली. त्यानंतर दोन्ही सावरकर बंधूंनी मिळून अंदमानमधील बंदिवानांसाठी कार्य केले. बाबाराव अंदमानमधील अन्याय यंत्रणेच्या विरोधात लढण्याचे काम करायचे. एवढेच नाही तर त्यांनी बंदिवानांचे नेतृत्व केले, त्यांच्यासाठी संप पुकारला. त्यांना चांगल्या सोयी मिळाव्यात, यासाठी लढा दिला. शुद्धीकार्य सुरू केले.
पुढे डॉक्टर नारायण सावरकरांनी सावरकर बंधूंची मुक्तता व्हावी, यासाठी फार मोठी चळवळ उभारली. मुंबईच्या ‘नॅशनल कमिटी‘च्या पुढाकाराने ८० हजार सह्या संग्रहित केल्या. सावरकर बंधू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. मे १९२१ मध्ये बाबाराव आणि तात्याराव सावरकर यांची अंदमानमधून सुटका करण्यात आली. स्वा. सावरकर यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आले. १९२२ मध्ये बाबाराव सावरकर यांना साबरमतीच्या कारागृहात हलवण्यात आले. नंतर बाबाराव सावरकर मुंबईला आले. त्यानंतर त्यांनी हिंदूहिताचे व्रत हाती घेतले.
त्यानंतर १९२५ मध्ये डॉक्टर हेडगेवार यांना बाबारावांनी संघ स्थापनेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. बाबाराव सावरकरांनी त्यांच्या आयुष्यात ‘राष्ट्रमीमांसा‘, ‘हिंदूराष्ट्र - पूर्वी, आता आणि पुढे‘, ‘छत्रपती शिवरायांची आग्र्यावरील गरुडझेप’, ‘विररत्नमंजुषा’, ‘ख्रिस्त परिचय’, ‘धर्म हवा कशाला?,’ ‘वीर बंदा बैरागी’ यांसारख्या ग्रंथांची निर्मिती केली. समाजाला दिशा देण्याचे काम केले. बाबाराव सावरकर पक्के देशभक्त होते. त्यांनी आयुष्यभर यातना भोगल्या. कष्टात आयुष्य काढले. अंदमानमध्ये झालेल्या छळामुळे त्यांच्या विविध शारीरिक तक्रारी वाढत होत्या. अर्धशिशीचा त्रास जाणवत होता. गुडघेदुखी होती. त्यांना औषधोपचारांसाठी मुंबई, येवले, नागपूर, अकोला, कोलकाता, जमखंडी अशा विविध ठिकाणी जावे लागले.
बाबारावांचे अखेरचे दिवस सांगलीत गेले. सांगलीत आल्यावर त्यांच्या अंगात रक्त कमी होते. तेव्हा सांगली-कोल्हापूरची २०-२५ तरुण मंडळी रक्तदानासाठी पुढे आली. रक्त देण्याचे काम सुरू झाले. डॉक्टर जोशी, डॉक्टर रानडे, डॉक्टर उदगावकर, डॉक्टर अभ्यंकर यांनी त्यांची सुश्रुषा केली. दि. १४ मार्च रोजी ते अस्वस्थ झाले. श्वास कोंडला. दि. १६ मार्च, १९४५ रोजी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी बाबाराव सावरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगलीच्या ’विक्रम’ पत्राने विशेषांक काढला. बाबारावांच्या मृत्यूची दुःखद वार्ता सर्वदूर पसरली. ठिकठिकाणी तारा पाठवून बाबारावांच्या निधनाचे वृत्त कळवण्यात आले. बुधगाव, माधवनगर, हरिपूर, जयसिंगपूर, मिरज, कोल्हापूर परिसरातून बाबारावांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे अनुयायी सांगलीमध्ये उपस्थित होते.
सात ते आठ हजार लोकांचा समुदाय जमला. ठिकठिकाणी अंत्ययात्रेमध्ये पुष्पहार अर्पण करण्यात आले. रात्री ८.३० वाजता अंतयात्रा संपली. कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर गंगाधरपंत दीक्षित यांच्या जागेमध्ये डॉक्टर नारायणराव सावरकर यांनी बाबारावांना अग्नी दिला. बाबाराव सावरकरांचा जीवनपट म्हणजे साक्षात धगधगते यज्ञकुंड होते. अशा बाबारावांचा सांगली नगरीशी अत्यंत जवळचा संबंध होता. सांगली नगरीत बाबारावांनी ज्या ठिकाणी देह ठेवला, त्याच कृष्णा नदीच्या काठावर त्यांना अग्नी देण्यात आला. अशा या सांगली नगरीला तीर्थक्षेत्राचे मांगल्य प्राप्त झाले. शिवभक्त भालजी पेंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी भव्य स्मारक उभे आहे. क्रांतिवीर बाबाराव सावरकरांचे हिंदुस्थानातील असे हे एकमेव स्मारक आहे. सावरकर भक्तांच्या परिश्रमातून हे स्मारक उभे राहिले. या स्मारकाचे उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्मारकाला शिवभक्त बाबासाहेब पुरंदरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांसारख्या अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी, पण बाबाराव हे कमालीचे श्रद्धाळू होते. ते सांगलीत आले की, रस्त्यातून फिरत फिरत हिंदू तरुणांना एकत्र करत त्यांच्या घरगुती अडचणींवर मार्गदर्शन करत. हिंदू संघटनेचे कार्यही त्यांनी अविरतपणे चालू ठेवले. त्यांची वैयक्तिक त्यागाची वेगळीच झळाळी होती. सांगलीमधील त्यांच्या भक्तांनी त्यांची शेवटच्या दोन वर्षांत कमालीची काळजी घेतली. सांगली ते दोन-तीन ठिकाणी राहिले. सकाळी बाहेर पडणे, वाचन-चिंतन करणे, हिंदू संघटन करणे यातच ते गुंतलेले असत. १९४२चे आंदोलन सुरू झाले. फाळणी झाल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, असा प्रचार सुरू होता. त्यामुळे बाबारावांनी हिंदू संघटनेचा आग्रह धरला. बाबाराव मनाने निर्मळ होते. त्यांच्या परिसस्पर्शाने अनेकांचे सोने झाले. बाल, वृद्ध, महिला सर्वांना त्यांनी आदराने वागवले. हिंदू समाजासमोर येणार्या सर्व समस्यांना टक्कर देण्यासाठी हिंदू समाजाला भरपूर मार्गदर्शन त्यांनी सांगलीत केले, हे सांगलीचे भाग्य. संपूर्ण सांगली बाबारावांची झाली होती.
बाबाराव सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, नारायणराव सावरकर या बंधूंची शेवटची हृद्यभेट सांगलीनगरीने पाहिली. महाराष्ट्र निर्मितीसाठी त्यांनी केलेला सततचा पाठपुरावा सांगलीकरांनी पाहिला. आजही स्मारकाच्या रूपाने क्रांतिवीर बाबारावांच्या प्रत्येक स्मृती सांगलीकरांनी निष्ठेने जपल्या आहेत. सांगली नगरीतील सिद्धार्थ परिसरातील हे स्मारक प्रेरणा देण्याचे काम करत आहे. ५ हजार, ५०० स्क्वेअर फूट जागेत चार हजार स्क्वेअर फूट बांधकाम असून आतमध्ये ग्रंथालय, व्यायामशाळा यासाठी स्वतंत्र हॉल आहेत. क्रांतिवीर बाबारावांची पंचधातूंनी बनवलेली पाच फुटी मूर्ती हे स्मारकाचे वैशिष्ट्य. ही मूर्ती संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदूंना कायमस्वरूपी प्रेरणा देत राहते.
क्रांतिवीर बाबाराव सावरकर स्मारक व स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, सांगली यांच्यावतीने सध्या स्मारकाची देखभाल केली जाते. विविध उपक्रम राबविले जातात. बाबारावांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांचे सामाजिक कार्य पोहोचवण्यासाठी या संघटना दिवसरात्र झटून प्रयत्न करत असतात. अशा या मातृभूमीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणार्या या भारतमातेच्या महान सुपुत्रास कोटी कोटी प्रणाम...