मुंबई : राज्यातील फडणवीस शिंदे सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील महिलांच्या सन्मानार्थ अनेक महत्त्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीसह विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. महिला बालविकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या विभागाच्या माध्यमातून युवती, महिला आणि बालिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेत महिलांचा सन्मान करत त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोढा यांनी 'सरकार आपल्या दारी' अभियान हाती घेतले आहे. प्रभागात जाऊन महिलांच्या समस्या सोडवण्याचे स्तुत्य पाऊल लोढांनी उचलले असून याला मुंबईकर महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. 'सरकार केवळ आमच्या दारी आले नाही तर त्यांनी आम्हाला न्याय देखील दिला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून 'इथे न्याय मिळतो' ही भावना महिलांमध्ये रुजायला सुरुवात झाली आहे, अशी भावना तक्रारदार महिलांनी व्यक्त केली आहे.
मुंबईच्या २७ प्रभागांमध्ये राबवणार उपक्रम
महिला - बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा उपक्रम संपूर्ण मुंबईत राबवला जात आहे. मुंबई शहर आणि उपनगर अशा दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण २७ प्रभागांमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून मुख्यत्वे नागरी समस्यांच्या तक्रारी महिलांकडून प्राप्त होत असून इमारत पुनर्विकास, दैनंदिन समस्या आणि महिलांचे इतर प्रश्न या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत मुंबईतील एकूण ३ प्रभागांमध्ये हा दरबार झाला असून त्यात शेकडो तक्रारींचे निवारण करण्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांना यश आले आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे अभियान मुंबई आणि उपनगरात राबवले जाणार असून त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती वाढवली जाणार आहे.
तात्काळ निराकरणावर सरकारचा भर
मंगळवारपर्यंत हे अभियान मुंबई शहरातील एकूण ३ प्रभागांमध्ये राबवण्यात आले आहे. डी नॉर्थ,जी दक्षिण आणि सी अशा तीन ठिकाणी जनता दरबार पार पडला असून त्यात साडेचार ते पाच हजार महिलांनी आपल्या गाऱ्हाणी सरकार दरबारी मांडली आहेत. या समस्यांपैकी किमान पाचशे समस्यांवर दरबारातच तोडगा काढण्यात लोढांना यश आले आहे. तर उर्वरित सर्व तक्रारी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाला एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या दरबाराच्या माध्यमातून केवळ समस्या ऐकून घेणे सरकारचे उद्दिष्ट नसून त्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यावर सरकारचा भर असल्याचे सिद्ध झाले आहे.
शासन प्रशासनाच्या प्रयत्नांतून समस्यांचे निराकरण !
महाराष्ट्र शासनाच्या महिला - बालविकास विभाग व बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई क्षेत्रातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी "सरकार आपल्या दारी" हे अभियान सुरु करण्यात आले आहे. मुंबईतील विविध प्रभागांमध्ये स्वतः मंत्री मंगलप्रभात लोढा प्रभाग कार्यालयात जाऊन महिलांच्या समस्या ऐकून घेत आहेत. सोबतीला प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती असल्याने शासन आणि प्रशासन यांच्या भागीदारीतून समस्या घेऊन आलेल्या महिलांचे प्रश्न सुटण्यास वेग मिळाला आहे. महिला विभागाचे मंत्री स्वतः समस्या सोडवण्यासाठी ठाण मांडून बसल्याने प्रशासन देखील गतिमानतेने काम करत असल्याचे आश्वासक चित्र निर्माण झाले आहे.
दारी येऊन समस्या सोडवणारे पहिलेच सरकार !
''मंत्रिमहोदयांनी आमच्याकडून लेखी स्वरूपात समस्यांची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आम्ही मंत्र्यांकडे समस्या मांडल्या असून त्यांनी त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न देखील सुरु केले आहेत. या आधीही आम्ही अनेकवेळा महापालिका आणि सरकारकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यावर कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळाला नव्हता. परंतु, हे सरकार आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी दारी आले असून अशाप्रकारे दारी येऊन समस्या सोडवणारे हे पहिलेच सरकार ठरले आहे. आमच्या समस्या ऐकून घेतल्याबद्दल मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मनापासून आभार''
- तक्रारदार महिला
लोकाभिमुख सरकारची जनतेला प्रचिती !
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर या अंतर्गत आम्ही मुंबईतील महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. महिलांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रशासनाच्या मदतीने आम्ही हे अभियान राबवत आहोत. प्रत्येक दरबारात आमच्याकडे एक हजार ते दीड हजार तक्रारी दाखल होत असून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तीन महिन्यांच्या आत महिलांनी मांडलेल्या समस्यांचे प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याची खूणगाठ आम्ही मनाशी बांधली असून लोकाभिमुख सरकार म्हणजे नक्की काय याची प्रचिती जनतेला या अभियानामुळे येत आहे.
- मंगलप्रभात लोढा, मंत्री महिला बालविकास विभाग महाराष्ट्र