मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, तेव्हा जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटले आणि प्रभू श्री राम मंदिरही तयार झाले. हे केवळ मंदिर निर्माण नाही, तर नव्या भारताची सुरुवात आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रामराज्य निर्माणाचा प्रारंभ आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मालाड पूर्व येथील रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या ‘डायरो’ या लोकसंगीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते प्रत्यक्षात साकारण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ज्या ठिकाणी प्रभू श्री राम मंदिर तोडून बाबरी मशिदीचा ढाचा तयार केला होता, त्याच ठिकाणी आता प्रभू श्री रामाचे मंदिर उभे राहिले आहे. २२ जानेवारी रोजी तेथे प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ५००-५५० वर्षाच्या संघर्षाला आता अंतिम स्वरूप नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईसह महाराष्ट्राचा विकास होत आहे. मुंबईतील अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रो, कोस्टल रोड यांसारखे प्रकल्प मार्गी लावून त्यांनी सामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य केले आहे.
अतुल भातखळकर, आमदार