समृद्धी'वर अपघातांच्या संख्येत घट तर प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ
30-Nov-2023
Total Views |
नागपुर : दिवाळीत रेल्वेच्या तिकिटांची कमतरता व प्रचंड महागलेला विमान प्रवास यामुळे प्रवाशांनी समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यालाच पसंती दर्शवली आहे. समृद्धी महामार्गावरुन १ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान तब्बल ३.८२ लाख वाहनांनी प्रवास केला असल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नव्हे तर अनेकदा अपघातांसाठी चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या संख्येतही घट झाल्याचेही दिसत आहे.
आतापर्यंत महिन्याभरात समृद्धी महामार्गावर नागपुर ते भरवीर दरम्यान १३ अपघात झाले. त्यानंतर आता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारकडुन अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २१ अत्याधुनीक शीघ्र प्रतिसाद वाहने, १४ ई.पी.सी. गस्त वाहने, १३ महामार्ग पोलीस केंद्रे व १३ क्रेन (३० टन क्षमतेची) सज्ज करण्यात आली आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत १४२ सुरक्षा रक्षक देखील नेमण्यात आलेत.
समृद्धी महामार्गाचा नाशिक ते नागपुर हा ५८२ किमी चा टप्पा प्रवाशांसाठी खुला आहे. उर्वरीत मुंबई ते नाशिक हा ११९ किमी चा टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे नागरीकांकडून प्रवासासाठी समृद्धी महामार्गाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.