भारताने निर्यातबंदी केल्यामुळे जगभरात तांदळाचे भाव वाढणार!
01-Nov-2023
Total Views | 35
मुंबई : २०२५ पूर्वी तांदळाच्या जागतिक किमती कमी होणार नसल्याचे जागतिक बँकेच्या ग्लोबल कमोडिटी आउटलुकमध्ये सांगण्यात आले आहे. एल निनोचा धोका कायम राहण्याची शक्यता असल्याने आणि काही प्रमुख तांदूळ उत्पादक देशांनी निर्यात कमी केल्याने तांदळाच्या जागतिक किमतीत २०२५ पुर्वी घट होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तांदळाची जागतिक किंमत २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये २८ टक्के जास्त आहे. तसेच २०२४ पर्यंत ती आणखी ६ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. एल निनोचा धोका, प्रमुख निर्यातदार आणि आयातदारांचे धोरणात्मक निर्णय तसेच तांदूळ उत्पादन आणि निर्यात बाजारातील आकुंचन यामुळे हे घडले असल्याचेही सांगण्यात येत आहे.
ऑगस्टमध्ये झालेल्या कमी पावसामुळे २०२३ मध्ये खरीप हंगामातील तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील तांदुळ उत्पादकांची चिंता वाढू शकते. दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वीच तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली असून तांदळाच्या काही वाणांवर आयात शुल्क लावले आहे.
त्यामुळे जागतिक तांदूळ बाजारपेठेतील पुरवठा ४० टक्क्यांनी कमी झाला आहे. पुरेशा पुरवठ्यामुळे कृषी मालाच्या किमती २०२३ मध्ये ७ टक्के तसेच २०२४ आणि २०२५ मध्ये आणखी २ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे, असेही कमोडिटी आउटलुकमध्ये म्हटले आहे.