महाराष्ट्र : बुलढाण्याहून सैलानी बाबांचं दर्शन घेऊन परतत असताना संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिली. याघटनेवर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने घटनास्थळाची पाहणी करत चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान, समृद्धीवर घडलेल्या घटनेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. हा अपघात झाल्याची माहिती मिळताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आणि हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर १० जणांहून अधिक जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. तसेच, हा अपघात झाल्याची माहिती मिळताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, जे या घटनेमध्ये दोषी असतील, जे आरटीओ अधिकारी असतील, ट्रकचा चालक असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून त्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.