मुंबई : सिनेटच्या निवडणुकीसाठी युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. म्हणाले, "आम्ही तर निवडणुकीची वाटच पाहत आहे. पहिल्यापासून आम्ही हेच म्हणत आहे की चाळीस आमदार आणि 13 खासदार यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे. सिनेट ठीक आहे पण त्यांनी महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात पण त्यांच्यात हिंमत नाहीये. म्हणून हे चालू आहे. नवीन वर्षात तरी या सरकारने हिंमत दाखवावी."
पुढे ते म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या निवडणुका या लांबणीवर पडलेल्या आहे. काही दिवसांपूर्वी अशोक गेहलोत आले होते. शिवराज सिंह चौहाण देखील येऊन गेले. हे मुख्यमंत्री आपआपल्या राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी येत असतात. मात्र आपले अवैध मुख्यमंत्री कधीही कुठे जात नाहीत. राज्याबाबत काहीही विचार करत नाही. त्यांनी ४० आमदार आणि एक गद्दार नेलाच आहे. मात्र मुंबईतून काहीही जाणं शक्य नाही."
आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदार आणि खासदार यांना पुन्हा गद्दार म्हणून उल्लेख करत निवडणुका घेण्याचे आवाहन दिले आहे. देवेन भारती यांची स्पेशल पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की यात काहीही नवीन नाही. कारण राज्याला सीएम आणि सुपर सीएम आहेत. सिनेटसह राज्यात महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. गद्दार सरकारमध्ये हिंमत असेल तर ते निवडणुका घेतील, असे आव्हानच त्यांनी यावेळी केली.