मुंबई: आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २१ सप्टेंबर रोजी शिवसेना मेळाव्यात भाजपवर टीका केली होती. हिंमत असेल तर पुढच्या महिन्यात मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घ्या असं आव्हान दिले होते. यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
"भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेस सोबत सलगी आणि शिवसेनेला संपवून स्वतः वाढणाऱ्या राष्ट्रवादी सोबत अती प्रेमाचे उमाळे यामुळे स्वपक्षातील लढवय्ये मोहरे पक्ष सोडून गेले. महाराष्ट्र हातून गेला, आता मुंबईकरांचे हातून मुंबई काढून घेणार याची चाहूल लागली. त्यामुळे तेलही गेले आणि तुपही गेले हाती धुपाटणे फक्त शिल्लक राहण्याची वेळ आली अशी अवस्था पेंग्विन सेनेची झाली आहे." असे म्हणत शेलार यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
सामना अग्रलेखातून फडणवीसांच्या समोरील आव्हानांची चिंता पेंग्विन सेनेने करू नये, असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना संबोधित करताना शेलार म्हणाले, "स्वतः मुख्यमंत्री होता तेव्हा का लगेचच निवडणुका घेतल्या नाहीत? आणि आता लगेच निवडणूक घ्या. पण तुमच्याकडे तुमचा धनुष्यबाण तरी हातात आहे का? असा सवाल शेलारांनी केला.