मुंबई : "राज्यात सध्या पैसे घेऊन काम करणाऱ्यांचे सरकार असून, त्याचे मुख्यमंत्री हे कंत्राटी कामगार आहेत" अशी टीका उद्धव ठाकरेंनी करत शिंदे गटासोबतचा वाद चिघळवतच राहणार हे सूचित केले. शिंदे गट कायम संयम राखत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जाणीवपूर्वक टीका करणे तालात असताना खुद्ध ठाकरे पिता-पुत्रच शिंदे गटाला शेलक्या शिव्या देण्यात धन्यता मानत आहेत. पुढे उद्धव ठाकरेंनी भाजपवरही टीका करत भाजपला आता लोक आयात करावे लागत आहेत असा टोला लगावला. मुंबई इलेकट्रीक वर्कर्स युनियनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.
हा कसला राष्ट्रीय पक्ष? जो दुसऱ्या पक्षातील नेत्यांना कारवाईच्या धाकाने, कधी पैसे चारून विकत घेऊन, पक्ष वाढवतोय ही सत्तापिपासू वृत्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही, असा त्रागा करताना उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी स्थापनेवेळची शिवसेनेची कोलांटीउडी विसरले. भाजपच्या या आक्रमकतेला त्यांनी सत्तापिपासू वृत्ती असे म्हटले. राज्यात सत्तेत आलेले नवे सरकार फक्त खोक्यांच्या बळावरच जन्माला आलेले असल्याने किती काळ राहील अशी शंका व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला.
दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असेही उद्धव ठाकरेंनी जाहीर केले. मला आत्ममग्न म्हणणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवावे की, मी महाराष्ट्राच्या भल्यासाठीच आत्ममन्ग होतो आणि त्यातून महाराष्ट्राचे भलेच झाले हे सर्वांनी बघितले असा दावा देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केला. आता पुढचे बोलणे दसरा मेळाव्यात शिवतीर्थावरच होईल असे सांगत उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केले.