मुंबई : एखाद्या रहस्यमय कथेपेक्षा, चित्रपटापेक्षा मोठा ट्वीस्ट महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पहायला मिळतोय. 'मी पुन्हा येईन' हे वाक्य तर जनतेच्या मनात पक्के बसले होते. महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता एक नवी कोरी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'रानबाजार' या वेबसिरीजच्या घवघवीत यशानंतर प्लॅनेट मराठी आता 'मी पुन्हा येईन' ही वेबसिरीज प्रदर्शित करणार आहे.
या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून अभिनेते भारत गणेशपुरे या सिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'मी पुन्हा येईन' असे भारत गणेशपुरे यांच्या तोंडी हे वाक्य ऐकून त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. त्यामुळे या सिरीजचा टीझर प्रदर्शित होताच या सिरीजची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
भारत गणेशपुरेच्या जोडीने यामध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केले आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील त्यांनी लिहिलेली पोस्टमनची पत्रे प्रेक्षकांना आवडली होती. त्यामुळे वेबसिरीजच्या माध्यमातून अरविंद जगताप आता नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.
या सिरीजच्या टीझर मधून दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी करतात,फूट पाडतात त्याचबरोबर शासकीय यंत्रणांचाही कसा बेमालूमपणे वापर केला जातो आणि अधिकारीवर्गही कशी आपली कामे करून घेतात, हे या टीझरमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर कपट-कारस्थान, संधीसाधुपणा, सत्तालोलुपता आणि सध्या चर्चेत असलेले 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' असा सगळा मसाला पाहायला मिळणार आहे.
'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा शब्दशः काही संबंध नाही, पण सिनेमात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळते जे आपल्या आजुबाजूला घडते. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी, राजकीय कुलंगड्या, हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरीज पूर्ण करेल."