दगा-फटका होऊ नये म्हणून शिवसेनेने घेतला महत्वाचा निर्णय..

    18-Jun-2022
Total Views | 91
y 
 
 
मुंबई: सोमवारी २० जून २०२२ रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने, सगळेच पक्ष सावध झाले आहेत. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या १० जागांपैकी ५ जागेसाठी भाजपने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र, सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाला ४ जागा निवडून आणता येतील असं दिसत आहे. राज्यसभेच्या पराभवाने महाविकास आघाडी सतर्क झाली असून भाजपसाठी ५ वा उमेदवार निवडून आणणे कठीण झाले आहे. आमदार फुटण्याची भीती असल्याने शिवसेनेसह जवळ जवळ सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
शिवसेनेने आपले आमदार पवईतील हॉटेल रेनेसाँमध्ये हलवले तर राष्ट्रवादीने आपले आमदार हॉटेल ट्रायडन्ट येथे हलवले आहेत. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या एका जागेच्या पराभवामुळे शिवसेनेनं यावेळी सावध पवित्रा घेतला आहे. रात्री उशिरा शिवसेनेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. तसेच हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना इतर कोणत्याही व्यक्तीला भेटण्यास बंदी घातली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पाऊसाचे दिवस आहेत. प्रत्येक पक्षाला आपले आमदार सांभाळायला हवेत, त्यांची काळजी घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली.
 
 
राज्याचे माजी गृहमंत्री व अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांची विधानसभेसाठी मतदान करता यावे, ही याचिका कोर्टाने फेटाळल्याने महाविकास आघाडीची दोन मतं कमी झालेली आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने काही आमदार महाविकास आघाडीवर नाराज आहेत. विधानपरिषदेत देखील चमत्कार करू असा दावा भाजपकडून केला गेला आहे. राज्यसभेची पुनरावृत्ती विधानपरिषदेच्या निवडणुकीत होऊ नये या साठी शिवसेनेच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121