मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला उमेदवार निवडून आणण्यात अपयश आल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी या पराजयाची जबाबदारी स्वीकारली असून, आपण उमेदवार निवडून आणण्यात अपयशी ठरलो, असे माविआ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.
"राज्यसभा निवडणुकीचा हा निकाल फारच धक्कादायक ठरला आहे, यामध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत हे काठावर वाचले, त्यांच्या जागी संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहीले असते तर चित्र वेगळं असतं, हे असे झाले नाही हेच आमचं नशीब" असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच सहावा उमेदवार निवडून आणण्यात आम्ही अपयशी ठरलो, अशी कबुलीदेखील भुजबळ यांनी दिली.
या निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊतांवर निशाणा साधला. "त्यांनी जेव्हापासून घोडेबाजार म्हणायला सुरुवात केली, तेव्हापासूनच त्यांच्या आमदारांनी ठरवले की, आपल्याला घोडे म्हणणाऱ्यांना आपली गरज नाही. संजय राऊतांपेक्षा जास्त मते आमचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना मिळाली आहेत. याचे आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी करावे", असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. "सत्ता येते, जाते पण ती इतक्या डोक्यात जाऊन द्यायची नसते", अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर केली.