मुंबई : “महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर, तर राज्याचा कर २९ रुपये आहे. आता उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा, राज्यात पेट्रोल-डिझेलची महागाई कोणामुळे आहे,” असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना या विषयावर आंदोलन करून खोटारड्यांना उघडे पाडण्याचे आवाहन केले. तसेच, “महाविकास आघाडी (मविआ) सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या केली असून ते परत मिळण्यासाठी लढा चालू ठेवा,” असेही ते म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक मुंबईत प्रदेश कार्यालयात मंगळवार, दि. २४ मे रोजी झाली. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन व आ. अॅड. आशिष शेलार तसेच, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व भाजप प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. बैठकीत राज्याच्या सर्व जिल्ह्यांतून पक्षाचे पदाधिकारीही ऑनलाईन सहभागी झाले.
इंधनवाढ केवळ मविआ सरकारमुळे
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्यामुळे किमतीत कपात झाली. परिणामी राज्यातील करामुळे मिळणारी रक्कमही आपोआप कमी झाली. तरीही हा दर आपणच कमी केल्याचे मविआने सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महागाईवर बोलत असतात. पण, आता राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर दहा रुपये जास्त असताना महागाई कोणामुळे आहे, हे या नेत्यांनी सांगितले पाहिजे. राज्यातील पेट्रोल-डिझेलची इंधनवाढ केवळ मविआ सरकारमुळे आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी याच्याविरोधात आंदोलन करून आघाडी सरकारचा खोटारडेपणा उघड करावा.”
आरक्षण मिळूच नये यासाठी षड्यंंत्र!
“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ते परत कसे मिळवायचे, याचा उपाय आपण मध्य प्रदेश सरकारला सांगितला. त्यानुसार त्यांनी डेटा गोळा करून कारवाई केली व त्या राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळाले. आपण हाच उपाय अनेकदा मविआ सरकारला सांगितला. पण, त्यांनी त्यानुसार कारवाई केली नाही व ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळाले नाही. ओबीसींना आरक्षण मिळूच नये, यासाठी कोणाचे तरी षड्यंंत्र दिसते,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.
श्रीकांत भारतीय यांनी सूत्रसंचालन केले. केंद्र सरकारच्या आठ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त होणार्या अभियानाचे राज्याचे प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. पदाधिकारी वासुदेव काळे, उमा खापरे, सुनील कर्जतकर, अरविंद पाटील-निलंगेकर, विक्रांत पाटील, प्रसाद लाड व योगेश टिळेकर यांनी संबंधित विषयांची निवेदने केली.
समाजातील सर्व घटकांशी संवाद साधा : चंद्रकांतदादा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने समाजाच्या सर्व घटकांशी भाजप कार्यकर्त्यांनी संवाद साधायचा आहे. मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत कशारितीनेपोहोचल्या आहेत, हे पाहायचे आहे.”
केंद्राचे काम जनतेपर्यंत पोहोचवा : सी. टी. रवी
“विरोधी पक्षांच्या मनात सर्दैव अदानी-अंबानी असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात मात्र सदैव गरीब, महिला आणि शेतकर्यांच्या कल्याणाचा विचार असतो. त्यांनी सुरू केलेल्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत बदलत आहे आणि मजबूत होत आहे. मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण होत असून, या सरकारच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संवाद साधावा,” असे आवाहन सी. टी. रवी यांनी यावेळी केले.