मुंबई : भोंग्यासंदर्भात राज्य सरकारने आपले म्हणणे मांडल्यानंतर मनसेनेही याप्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली. आपण दिलेल्या ‘अल्टिमेटम’वर ठाम असल्याचे म्हणत मनसेने अप्रत्यक्षपणे संघर्षाचा इशारा दिला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात म्हटले की, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या ‘अल्टिमेटम’वर आम्ही ठाम आहोत.
आम्हालाही कायदा सुव्यवस्था उत्तम राखायची आहे. कुठेही गालबोट लागता कामा नये, ही आमची भूमिका आहे. राज ठाकरेंनी भूमिका मांडली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचाच दाखला दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे इतर धर्मीयांना मिळत आहे, तशी आम्हालाही परवानगी द्यावी. राज ठाकरेंनी ‘अल्टिमेटम’ दिला आहे. आता राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपकांसंबंधी नियम सांगितले आहेत. वर्षभर लोकांना परवानगी देणार असे होत नाही,” असे नांदगावकर यांनी सांगितले.