मुंबई: "हिंदू धर्मियांची पवित्र हनुमान चालीसा म्हणणे शिवसेनेच्या राज्यात राजद्रोह ठरले आहे, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे हिंदुत्व मिठी नदीत बुडवून टाकले" अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीकेचा आसूड ओढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी आलेल्या नवनीत राणा - रवी राणा या दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणा दांपत्यावर कलम १५३ (अ) आणि कलम १३५ मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांच्या जमीन अर्जावर २९ एप्रिल रोजी सुनावणी घेतली जाईल.