नवी दिल्ली : क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान या दोन संघांतील लढत पाहता येणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक २०२२च्या तारखा जाहीर केल्या आहेत. श्रीलंका या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्ट रोजी होणार असून अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून स्पर्धेच्या तारखांची माहिती दिली आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. त्यामुळे रोहित सेना आता विश्वचषकमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. तर, स्पर्धेतूनही बाहेर पडावे लागले. भारतीय संघाने आत्तापर्यंत ७ वेळा आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आहे. भारताने २०१६ आणि २०१८ मध्ये सलग दोन विजेतेपद पटकावली आहेत. आशिया चषक स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते, पण २०२० ची स्पर्धा आशियाई क्रिकेट परिषदेने कोरोना महामारीमुळे रद्द केली होती. यामुळे समितीने यंदा ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला.