मुंबई : आयपीएल २०२२चा मेगा लिलाव झाल्यानंतर आता अखेर बीसीसीआयने तारीख जाहीर केली आहे. येत्या २६ मार्चपासून आयपीएल २०२२ला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे कोरोनाची भीती पाहता या स्पर्धेचे सर्व सामने हे मुंबई आणि पुणे या २ ठिकाणीच आयोजित करण्यात येणार आहे. हे सामने मुंबईतील वानखेडे स्टेडिअम, ब्रेबॉर्न स्टेडिअम आणि पुण्यातील डीवाय पाटील स्टेडिअमवर होणार आहेत.
आयपीएलचे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी सांगितले की, "लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे यावर्षी तब्बल ७० सामने खेळवण्यात येणार आहेत. येत्या २६ मार्चला सामन्यांना सुरुवात होणार असून हे २९ मे ला अखेरचा सामना खेळवला जाईल. संपुर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. स्टेडिअममध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांची संख्या २५ किंवा ५० टक्के असेल, हे महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक नियमांनुसार ठरवण्यात येईल," अशी माहिती दिली.
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत, "महाराष्ट्रात आपले स्वागत आहे." असे म्हंटले आहे. याची चांगलीच चर्चा आता सोशल मिडीयावर सुरु झाली आहे.
आयपीएल २०२२मध्ये असणार नवे स्वरूप
आयपीएल २०२२मध्ये सामन्यांचे आयोजन हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे. यंदाच्या हंगामापासून १० आयपीएल संघ झाल्यामुळे या दहा संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. या दोन गटात प्रत्येकी ५ संघ असतील पण, एक संघ १४ सामनेच खेळणार आहेत.
असे असतील ग्रुप :
ग्रुप अ : मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट
ग्रुप ब : चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर बेंगलोर, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स