मुंबई: मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून अवघ्या सहा महिन्यांत कुर्ल्यामध्यें एका बेकायदा इमारतीचे बांधकाम झाल्याचे उघड झाले आहे. कुर्ला येथील कुरेशी नगर मधील चर्बी गल्ली मध्ये ही इमारत बांधली गेली आहे. महापालिकेच्या अधिकाराऱ्यांचा या कामाला आशीर्वाद असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आरईटीएमएस या नावाने वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. तरीसुद्धा अशा प्रकारची बांधकामे भूमाफियांकडून सर्रासपाने सुरु आहेत हेच यातून उघड होते आहे.
एल वॉर्ड कार्यालयातील प्रभाग १७१ मध्ये हे बांधकाम येते. स्थानिकांनी याची चौकशी केली असता ५५ हजार चौरस फुटांचे आरसीसी बांधकाम झाल्याचे समजले. या बद्दल पालिकेच्या आरईटीएमएस वेबसाईट वर चौकशी केली असता ८ मे २०२१ रोजी हाजराबी गफ्फार चाळीच्या रहिवाश्यांनी जुनी इमारत पडून नवीन इमारत बांधली असल्याचे लक्षात आले. या संदर्भात बीट अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीच्या याआधारे अहवाल तयार करून ,नोटीस कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठवली. कार्यकारी अभियंत्यांनी या नोटीशीला मंजुरी देण्यासाठी २४ तासांऐवजी १०३ दिवस लावले. त्यानंतर ३८ दिवसांनंतर ही नोटीस मुकादमाकडे पाठवली. त्यानंतर २९ दिवसांनंतर जमीन मालकाला नोटीस गेली. जमीन मालकडून खुलासा यायला ४० दिवस लागले आणि आता बीट अधिकाऱ्यांनी याच घटनेचा दुसरा अहवाल तयार केला आहे पण त्यातही पुष्कळ चुका असल्याचे दिसत आहे.
मुंबईतील बेकायदा बांधकामे हा गंभीर विषय असला तरी पालिकेच्याच अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून उभी राहत असलेली बेकायदा बांधकामे नागरिकांना त्रस्त करत आहेत.