मुंबई : ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी यासंबंधीची माहिती दिली असून नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त या समितीचे प्रमुख असणार आहेत.
महाराष्ट्रात जनता एकीकडे ‘कोविड’ महामारीमुळे त्रस्त असताना दुसरीकडे सरकारमधील मंत्र्यांचे विविध कारनामे बाहेर येताना दिसत आहेत. आधी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वसुलीच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला आहे, तर आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या ‘आरटीओ’मध्ये सुरू असलेल्या महावसुली विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचे रॅकेट कसे चालते, याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या ‘मॅनेज’ करत असून ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करत आहेत असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केला आहे. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत.
या आदेशानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे आणि नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त हे या समितीचे नेतृत्व करणार आहेत. याआधी बडतर्फ एपीआय’ सचिन वाझे याने ‘एनआयए’ला दिलेल्या जबाबामध्ये अनिल परब यांनी वसुली करायला सांगितल्याचे म्हटले होते, तर त्यानंतर आता गजेंद्र पाटील यांची तक्रार समोर आली आहे. या सर्व प्रकारावरून विरोधातील विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी जोरात केली जात आहे.