मुंबई : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी मुंबईतून तब्बल ७ किलो युरेनियम जप्त करण्यात आले होते. यानंतर या संदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला. मात्र, यावर भाजप मध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी राज्य सकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत विचारले आहे की, "जिलेटीनचा तपास एनआयएकडे द्यायला, राज्य सरकारने विरोध केला होता. मात्र, युरेनियमचा तपास स्वतःहून एनआयएकडे दिला. असे का?" असा प्रश्न त्यांनी महाविकास आघाडीला विचारला आहे.
'एटीएस'ने मुंबईतून ७ किलो युरेनियम जप्त केला. यासंदर्भात भंगारचा व्यवसाय करणाऱ्या अबू तहीर चौधरी आणि जिगर पांड्या या आरोपीना अटक केली. न्यायालयाने त्यांची रवानगी १२ मे पर्यंत एटीएस कोठडीत करण्यात आलेली आहे. तब्बल २५ कोटी रुपयांचा ७ किलो युरेनियम विकण्याचा प्रयत्न जिगर पांड्याकडून केला जात होता. याबद्दलची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर त्यांनी या संदर्भात तपास करण्यास सुरुवात केली होती.