स्वारगेट पोलीस ठाण्यात अॅड. प्रदिप गावडेंनी दाखल केली तक्रार
पुणे : शरजिल उस्मानीने ३० जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे झालेल्या 'एल्गार परिषदेत' हिंदू समाजाविरोधात विष ओकण्याचे घृणास्पद कृत्य केल्याबद्दल त्याच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात अॅड. प्रदिप गावडे यांनी सोमवार, १ फेब्रुवारी २०२१ रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. शरजिल उस्मानीवर धार्मिक तेढ निर्माण करणे, धर्माच्या भावना दुखावणे, एखाद्या समाजाला भडकावणे आदी गंभीर स्वरुपाचे आरोप लावण्यात आले आहेत.
पुण्याच्या 'गणेश कला क्रीडा मंदिर' या सभागृहात 'एल्गार परिषद २०२१' पार पडली. कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानीला भाषणासाठी आवतान धाडले होते. अर्थात कार्यक्रम रंगात आणण्यासाठी आणि हिंदूविरोधी वक्तव्यांसाठी त्याची गरजही होती. शर्जील आयोजकांच्या या विश्वासावर खरा उतरला. त्याने केलेल्या भाषणात भारतीय संघराज्यविरोधात व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावू विधाने केली.
हिंदू समाज हा अत्यंत सडलेला आहे, असे आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या भावना दुखावणारे व दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केले. ज्यामुळे एल्गार परिषद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शरजिल उस्मानी यांचे तंतोतंत विधान असे आहे की "हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरिके से सड़ चुका है", त्याचे हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक '१३५ अ' व '२९५ अ' यानुसार गुन्हा ठरते, त्यामुळे तातडीने त्याच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शरजिल उस्मानी याने न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अवमान करत, मी भारतीय संघराज्य मानत नाही असेही विधान केले आहे. (I don't believe in Indian State) त्यांचे हे विधान भारतीय संघराज्याच्या अपमान करणारे व भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे. आणि अशा पद्धतीचे विधान करणे, हे भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक '१२४अ' नुसार गुन्हा आहे. त्यामुळे ही तक्रार करताना शरजिल उस्मानी यांच्या भाषणाची प्रत जोडत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती तक्रारकर्त्यांनी केली आहे. महाविकास आघीडी सरकार, गृहमंत्री अमित देशमुख या कारवाईबद्दल तत्परता दाखवणार का, असा आता प्रश्न उपस्थित होत आहे.