नक्षत्रासम दागिने घडविणार्‍या ‘स्वातीताई’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2021   
Total Views |

swati takle.jpg_1 &n



नाशिकमधील पहिल्या महिला सराफ व्यावसायिक स्वाती टकले यांच्या सुवर्णमयी कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख...




राफ व्यवसाय किंवा पेढी हे प्रामुख्याने ‘पुरुषांचे कार्यक्षेत्र’ असा गेली काही वर्षे एक समज प्रचलित होता. मात्र, याच पुरूषप्रधान क्षेत्रात आज अनेक महिला व्यावसायिकांनी आपले पाय अगदी भक्कमपणे रोवले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नाशिकच्या स्वाती टकले. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ स्वातीताई सराफ व्यवसायात कार्यरत आहेत आणि नाशिकमधील पहिल्या महिला सराफ म्हणून त्या ओळखल्या जातात.


स्वातीताई मूळच्या नाशिकच्याच. त्यांचे आईवडील दोघेही वकिली व्यवसायात. त्यांची आई, अलका वर्तक नाशिकमधील पहिली महिला वकील होती. लहानपणापासून कुसुमाग्रजांचा शेजार व सहवास लाभलेल्या स्वातीताई तात्यासाहेबांच्या अतिशय लाडक्या. साहित्याची, वाचनाची आवड निर्माण होऊन व्यक्तिमत्त्व विकासात कुसुमाग्रजांच्या साहित्याचा मोठा वाटा आहे, हे स्वातीताई अगदी आवर्जून सांगतात. त्यांनी नाशिकमधील आरवायके महाविद्यालयातून विज्ञान विषयात पदवी शिक्षण घेतले. पुढे सतीश टकले यांंच्याशी विवाहापश्चात त्या ‘टकले बंधू आणि सराफ’ या सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिकांच्या कुटुंबाचा भाग झाल्या.

 
 
लग्नानंतर, मुलांच्या जन्मानंतर महिलांनी आपले करिअर सोडून देण्याकडे सहसा कल दिसतो. मात्र, स्वातीताईंनी त्यांच्या दोन मुलींच्या जन्मानंतर सराफ व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. दागिने विक्रीच्या पिढीजात व्यवसायात असलेल्या घरात त्यांनी मात्र दागिने घडविण्याच्या एका वेगळ्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आवश्यक असणारे शिक्षणदेखील राजकोट येथे वसतिगृहात राहून घेतले.


कुठल्याही क्षेत्रात नव्याने सुरुवात करायची,तर त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि मेहनत हवीच, या विचाराच्या पायावर त्यांनी आपले ‘ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ सुरू केले. आज या क्षेत्रासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध असले आणि या क्षेत्रात कार्यरत महिलांची संख्या भरपूर असली, तरी स्वातीताई त्यांच्या अग्रणी ठराव्या. महिलांना मुळातच दागिन्यांची आवड व हौसही असते आणि दागिने निवडण्याची पारख व समजही असते. त्यामुळे सराफा दुकानांमध्ये मदतनीस म्हणून महिलांची निवड करण्याला प्राधान्य दिले. यात महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचा आनंददेखील होता, असे स्वातीताईंना वाटते. आजतागायत हजारो पद्धतीचे नवनव्या डिझाईनचे मंगळसूत्र, नेकलेस त्यांनी घडवले आहेत. केवळ सोन्यातच नव्हे, तर चांदी, मोती अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये देखील त्यांनी दागिने घडवले आहेत.

 
एक महिला जेव्हा कुटुंब व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर कार्यरत होऊ पाहते, तेव्हा तिला तिच्या कुटुंबाकडून मिळणारा आधार फार महत्त्वाचा असतो आणि तो आधार आपल्याला आपल्या कुटुंबाकडून कायमच मिळाला, हे त्या आवर्जून नमूद करतात. सराफ व्यवसाय हा तसा जोखमीचा. सोन्यासारख्या धातूशी निगडीत काम करताना चोरी होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे बाळगावी लागणारी सजगता, सोनं आणि दागिन्यांच्या घडवणीनंतरचे सोन्याचे वजन जुळवणे, काळाप्रमाणे दागिन्यांचे प्रकार बदलणे, येणार्‍या स्पर्धेला सामोरे जाणे अशा अनेक पातळ्यांवर जबाबदारी स्वातीताईंनी आजवर खंबीरपणे पार पाडली.




 
आपल्यात उपजतच असलेल्या गुणांना, कर्तृत्त्वाला महिलांनी योग्य वाव दिला पाहिजे, असे ठाम मत असणार्‍या स्वातीताई ‘’व्यवसायामुळे आत्मविश्वास मिळतो, स्वप्रतिष्ठा जपता येते,” असे सांगतात. मात्र, त्यासाठी आवश्यक असते ती जिद्द, कष्टाला कधीही मागे न हटण्याची वृत्ती, प्रसंगी रात्रीचा दिवस करून दिलेला शब्द पाळण्यासाठीची निष्ठा, नैतिकतेचे अधिष्ठान असे अनेक गुण, असेहे मत स्वातीताई मांडतात. कुठल्याही कलेच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक असते ती कलाकाराची प्रामाणिकता. स्वातीताईंच्या हातून साकारलेल्या दागिन्यांच्या डिझाईन्समध्येदेखील हीच प्रामाणिकता जपण्याचा त्यांनी सदैव प्रयत्न केला. “आपण घडवलेली कलाकृती ग्राहकांच्या पसंतीस उतरते, तेव्हा तिचं मोल आपल्यासाठीही वाढत जातं,” असं स्वातीताई अधोरेखित करतात.



दागिने घडविण्याच्या प्रक्रिया स्वतः शिकणे, त्यातले बारकावे आत्मसात करणे, ते एका सराफा व्यवसायाची संचालिका होऊन तो व्यवसाय नावारूपाला आणणे, हा स्वातीताईंचा संपूर्ण प्रवास.. या प्रवासात वैयक्तिक पातळीवर मुलांची शिक्षणं व त्यांच्या करिअरकडेही स्वातीताईंचे बारकाईने लक्ष होते. त्यांच्या एका मुलीने ‘ज्वेलरी मेकिंग’चे शिक्षण घेतले आहे, तर मुलगा अभियंता असून व्यवसायात त्यांच्याबरोबरीने कार्यरत आहे. “स्त्रीने ठरवले तर ती अष्टभुजा नारायणी असते, तिच्यातील क्षमतांचं बळ तिच्या पाठीशी असतं,” असं म्हणणार्‍या स्वातीताईंचा संगीत ऐकणं हा एक जिव्हाळ्याचा छंद. उत्तम वक्त्यांच्या सभांना हजेरी लावणेही त्यांना आवडते. भविष्यात व्यवसायातून निवृत्ती घेऊन हे सर्व छंद पुन्हा एकदा जोपासण्याचा त्यांचा मानस आहे.





पुरुषप्रधान व्यवसायात स्वातीताईंनी न केवळ आपले अस्तित्व टिकविले, तर कर्तृत्त्वाने आपले नावदेखील मोठे केले. ‘स्वाती’ नक्षत्र ज्याप्रमाणे मोत्याची निर्मिती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, त्याचप्रमाणे स्वातीताईंनी नक्षत्रासम दागिने घडवत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!








 

 
@@AUTHORINFO_V1@@