मुख्यमंत्री केवळ वांद्रेपुरतेच

चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

    27-Oct-2021
Total Views | 89
 
 
bavankule_1  H
 
 
 
मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) : 'मागील १६ महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकदाही मंत्रालयात आलेले नाहीत. ते घरात बसून राज्याचा कारभार हाकत आहेत. या कालावधीत त्यांनी एकाही कागदावर सही केलेली नाही. सत्ताधारी पक्षातील आमदारांनाही हे कळून चुकले आहे की त्यांची कामे आता होणार नाहीत. मुख्यमंत्री केवळ बांदऱ्यापुरते तर अन्य मंत्री हे त्यांच्या जिल्ह्यापुरते राहिले आहेत,' अशा शब्दांत राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीका केली. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मंगळवार,दि.२६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
 
महाराष्ट्र भाजयुमोतर्फे सुरु करण्यात आलेल्या 'युवा योद्धा संकल्प' यात्रेचा दुसरा टप्पा नुकताच संपला. या यात्रेच्या पुढच्या टप्प्यात राज्यातील २५ लाख युवकांना संघटित करून एकट्या मुंबईत तब्बल ५ लाख युवकांना युवा वॅरियर्स बनविण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. या अभियानाअंतंर्गत आतापर्यंत १३२ विधानसभा क्षेत्रात हि संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला जात असून जनतेत सरकारविरोधात असलेला आक्रोश मांडण्याचा प्रयत्न केला जाईल असे भाजयुमो पदाधिकाऱ्यांच्यावतीने सांगण्यात आले.
 
 
यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, ' मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यात भ्रष्टाचाराच्या घटना समोर येत आहे, शेतकऱ्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. यापैकी कुठल्याही बाबीवर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. मुख्यमंत्री 16 महिण्यापासून घरात आहेत, पण जर मुख्यमंत्री घरात असतील तर मग राज्य कसे चालणार ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. राज्यातील शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. आदिवासी भागातील लोकांचे खावटी बंद केली जाते आहे, असे बावनकुळे म्हणाले.
 
 
राज्यातील प्रश्न प्रलंबित
"महाराष्ट्रातील मागास भागांसाठी निर्माण करण्यात आलेली वैधानिक मंडळ सरकारने बंद केली. राज्यात सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत. सरकारची समाजातील घटकांवर अपेक्षित असलेले नियंत्रण सुटले आहे. या सर्व बाबींविरोधात भाजप जनतेसोबत आहे आणि वेळप्रसंगी सरकारविरोधात आवाज उठवल्याशिवाय भाजप राहणार नाही,' असा इशारा बावनकुळे यांनी यावेळी दिला.
 
 
ओबीसी आरक्षणावर सरकारचं धोरण अस्पष्ट
'ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार अकार्यक्षम आहे हे सिद्ध झाले आहे. आरक्षणाच्या बाबतीत सरकारने आपले धोरण जाहीर करावे अन्यथा जनता सरकार विरोधात संघर्षासाठी तयार असून भाजप देखील आरक्षण प्रश्नी आंदोपणाचा पर्याय स्वीकारेल, असे बावनकुळे म्हणाले.
 
 
जावयामुळे मलिकांचे जगणे मुश्किल
राज्यभारतात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरून बोलताना बावनकुळे म्हणाले, 'जावयाला झालेल्या अटकेमुळे नवाब मलिकांना घरात जगणे मुश्किल झाले आहे. प्रत्येक प्रकरणाला जातीयवादी रंग देणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ड्रग्ज प्रकरणामुळे पुन्हा एकदा जातीयवादी राजकारणाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक घटनेला हिंदू मुस्लिम रंग देणं हे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करतात आहेत. एका घटकाचे तुष्टीकरन करायचे आणि र्रजकारण करत आपली राजकीय पोळी भाजून घ्याची हे त्यांच्या रक्तात आहे. या प्रकरणाला जातीयवादी रंग देऊन ड्रग्ज केसाच्या तपासला डायव्हर्ट करण्याचा नवा मलिक यांचा हा प्रयत्न आहे," असे बावनकुळे म्हणाले. तसेच नवाब मलिक आणि सत्ताधारी मंडळी सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याचंही आरोप त्यांनी केला.
 
 
 
भाजयुमो ड्रग्ज विरोधात काम करणार : तेजिंदर सिंह तिवाना
भाजयुमोतर्फे 'युवा संकल्प योद्धा' यात्रेच्या माध्यमातून येत्या काळात युवा मोर्चाच्या 9987 शाखा उघडण्यात येणार असून प्रत्येक शाखेद्वारे 50 कार्यकर्ते अशा स्वरूपात 5 लाख युवकांना भाजपसोबत जोडन्याचा आमचा संकल्प आहे. राज्याच्या संस्कृतीला ज्या ड्रग्जमुळे धक्का लागला आहे, त्या ड्रग्जविरोधात युवा मोर्चा काम  करणार आहे,' असे मुंबई भाजयुमोचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी यावेळी म्हटले
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121