नवी दिल्ली : येत्या रविवारी २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये महालढत होणार आहे. आयसीसी टी-२० चषक स्पर्धेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असून सर्व जगाचे लक्ष या महा-लढतीकडे लागले आहे. यानिमित्ताने पाकिस्तान क्रिकेट संघाने १२ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये माजी कर्णधार सरफराज अहमदला बाहेरचा रस्ता दाखवला असून त्याऐवजी शोएब मलिकची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेद्वारे याची घोषणा केली.
पाकिस्तान संघात बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ यांना जागा दिली. संघाने माजी कर्णधार सरफराज अहमदचा शेवटच्या १२ मध्ये समावेश केलेला नाही. सरफराजला टी -२० विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात स्थान मिळाले नाही. पण नंतर त्याला १५ जणांच्या संघात स्थान मिळाले. सरफराज हा संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा शोएब मलिक शेवटच्या १२मध्ये परतला आहे. मलिक जवळपास वर्षभरापूर्वी राष्ट्रीय संघाकडून शेवटचा खेळला होता. शोएब २००७ पासून ५ टी -२० विश्वचषक खेळला आहे. त्याला २२ वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. टी-२० विश्वचषकातील २८ सामन्यांमध्ये मलिकने ३२.११ च्या सरासरीने ५४६ धावा केल्या आहेत.