नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याची निवड राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. त्याच्यासोबत टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा, पॅरालंपिक सुवर्ण पदक विजेता मरियप्पन थंगावेलू आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांचादेखील यामध्ये समावेश आहे.
‘खेलरत्न’ पुरस्कार मिळवणार तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी सचिन तेंडूलकरला १९९८मध्ये, महेंद्रसिंग धोनीला २००७ तर विराट कोहलीला २०१८मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीच्या झालेल्या बैठकीत रोहित, विनेश फोगाटसह अन्य दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहितने ५ शतके आणि १ अर्ध्यशतक झळकावले होते.त्याच्या या कामगिरीवरून बीसीसीआयने त्याच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली होती.
भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या महामारीमुळे विजेत्यांची घोषणा ही ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.